Tuesday, May 27, 2025

लाईव्ह मुलाखतीत पंडित नेहरु चिडले होते, पुलंनी एक प्रश्न पाठवला आणि…

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. आपल्या कमालीच्या निरीक्षण शक्तीने आपली लेखन शैली त्यांनी निर्माण केली. त्यांचं लिखाण त्यांच्या तोंडून ऐकताना किंवा त्यांचं लिखाण वाचताना ते पात्र, तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहातो. पुलंच्या लिखाणाचं हे विशेष आहे. आपल्या लेखनशैलीवर लहानपणी ऐकलेल्या किर्तन शैलीचा प्रभाव आहे. मला किर्तनात जसं पाल्हाळ लावतात ते खूप भावलं. मुद्दा सोडून चाललोय असं वाटत असतानाच लगेच मुद्द्याकडे यायचं असं काहीसं मी माझ्या लिखाणाकडे पाहतो असं पुलंनी म्हटलं होतं. दूरदर्शनची नोकरी मात्र आपल्याला भावली नाही असं पुलंनी सांगितलं.

रेडिओ, टीव्ही या माध्यमांमध्ये पुलंनी काम केलं. मात्र तिथे मन रमलं नाही. कारण तिथे मनोरंजनापेक्षा लोकशिक्षणाचा भाग अधिक होता असं पु.ल. देशपांडे यांनी म्हटलं होतं. अशातच टीव्हीमध्ये काम करत असताना १४ नोव्हेंबरला पंडित नेहरुंना बोलवायचं ठरवलं. त्यांना बोलवलं ते आलेही.. मात्र लाईव्ह कार्यक्रमात ते चिडले. दिवशी काय घडलं होतं? हा किस्सा पु.ल. देशपांडे यांनीच सांगितला होता.

पंडित नेहरुंच्या त्या कार्यक्रमांची संकल्पना काय होती?
“आमच्या टेलिव्हिजन स्टुडिओत एक छोटा हॉल होता. त्यातच सगळे कार्यक्रम व्हायचे. पंडित नेहरुंची मुलाखत त्याच छोट्या हॉलमध्ये घ्यायची असं ठरलं होतं. आधी आम्ही असं ठरवलं होतं की पंडित नेहरुंचा लहान मुलांशी संवाद होईल. पंतप्रधान पंडित नेहरु येतील, ते टेलिव्हिजनच्या हॉलमध्ये बसतील. मुलं ही जणू काही संसदेचे सदस्य आहेत आणि त्यांना प्रश्न विचारत आहेत. त्याला पंडित नेहरु उत्तर देत आहेत. मी प्रश्नही निवडले होते. तुम्ही नेहमी लाल गुलाब का लावता? पिवळ्या गुलाबाने तुमचं काय घोडं मारलं आहे?, तुम्हाला घोड्यावर बसायला आवडतं मग भारतातल्या प्रत्येक शाळेत एक घोडा असला पाहिजे असा आदेश तुम्ही का काढत नाही? अशा प्रकारचे प्रश्न होते. मात्र आमच्या वरिष्ठांना ते काही पटलं नाही. मला त्यांनी सांगितलं सामान्य माणसांशी यांचा (पंडित नेहरु) संवाद ठेवा.” आता त्यावेळी सामान्य माणसं आणायची हे थोडंसं कठीण होतं. कारण आणलेले ते लोक काय बोलतील सांगता येत नव्हतं. त्यावेळी कार्यक्रम रेकॉर्ड करता येत नसे. जो कार्यक्रम होईल त्याचं थेट प्रक्षेपण (LIVE) असे. रेकॉर्डिंग मशीन आलंच नव्हतं. त्यामुळे लाईव्ह करताना काळजी घ्यावी लागत असे.”


सामान्य माणसं आणली त्यांच्या प्रश्नांमुळे वातावरण तापलं होतं-पुलं
“मी वरिष्ठांना सांगितलं की असं कॉमन लोकांना आणून बसवणं रिस्की आहे. पण त्यांनी सांगितलं नाही तुम्ही हे कराच. मग मलाही राग आला होता. मी गेलो आणि काही सामान्य माणसं खरंच आणून बसवली. त्यात एक रिक्षावाला होता, एक असा माणूस होता ज्याला पाहिल्याबरोबरच भीती वाटावी. असे लोक मी आणून बसवले आणि त्यांना प्रश्न विचारायचे आहेत हे कार्यक्रमाचं स्वरुप सांगितलं. ठरल्याप्रमाणे त्यादिवशी पंडित नेहरु आले. त्यांनी स्टुडिओत ही सगळी माणसं बसलेली पाहिली तेव्हा मला म्हणाले ये सभी उंची उमर के दिखायी दे रहें है… त्यावेळी मी त्यांना म्हटलं ये भी एक जमाने में बच्चे थे. You Are Very Clever Young Man असं पंडित नेहरु म्हणाले आणि चांगल्या मूडमध्ये मुलाखतीसाठी बसले. तिथे रिक्षावाल्याने त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की पंडितजी हमारे स्लम जलानेवाले हैं और वहां इमारत खडी करने वाले हैं. पंडित नेहरुंना पहिलाच प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे जा. त्यावर रिक्षावाला म्हणाला वो लोग कह रहें है आपके पास जाओ, आप कह रहे हैं उनके पास जाओ. हमको सभी थप्पड लगाते है..मला मनात वाटलं झालं पंडित नेहरु आता चिडले. बरं हे सगळं लाईव्ह सुरु होतं प्रसारित होत होतं. हे सगळं कमी काय म्हणून त्यांना (पंडित नेहरु) यांना आणखी प्रश्न आला दिल्लीमें अठ्ठनी वाले स्कूल भी हैं और ५०० रुपयेवाले स्कूल भी है..हमारे बच्चे कितने दिन अठ्ठनी वाले स्कूलमें जायेंगे? या प्रश्नानंतर वातावरण तापू लागलं.

फ्लोअर मॅनेजरकडून पाठवलेली चिठ्ठी आणि..
त्यावेळी मी फ्लोअर मॅनेजरकडून त्यांच्यात एक वृद्ध गृहस्थ होते त्यांना चिठ्ठी पाठवली. त्या चिठ्ठीत प्रश्न लिहून पाठवला होता, ‘पंडितजी तुम्ही देशाची एवढी जबाबदारी घेता, इतकं काम करता तरीही तुमचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा फुललेला कसा राहतो?’ या प्रश्नानंतर पंडित नेहरु जरा शांत झाले. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी खूप छान दिलं होतं. पंडित नेहरु म्हणाले होते, मी पार्लमेंट पार्लमेंटमध्येच ठेवून येतो.. ते घरी आणत नाही. सकाळी बागेतून फिरून येतो. लहान मुलांबरोबर वेळ घालवतो. तसंच महिन्या-दोन महिन्यांतून एखाद्या डोंगरावर जाऊन येतो आणि आजूबाजूच्या प्रदेशाचं दर्शन घेत असतो. हे मला तरुण ठेवत असतं. या नोटवर तो कार्यक्रम आम्ही संपवला. नाहीतर पंचाईत आली असती भांडणं झाली असती. हा प्रसंग घडला तरीही मुलाखत घेत असताना ज्याची मुलाखत घेतली जाते त्याला टॉपल करणं महत्त्वाचं आहे. थोडा भडका उडाला की तो माणूस खरी उत्तरं द्यायला लागतो.” असा किस्सा पुलंनी सह्याद्री वाहिनीच्या मुलाखतीत सांगितला होता.

टेलिव्हिजनची नोकरी का सोडली?
टेलिव्हिजनची नोकरी सोडली कारण तिथे मनोरंजन कमी आणि लोकशिक्षण जास्त होता. मला त्याचा कंटाळा येऊ लागला. कारण नाईलाज म्हणून आम्ही मनोरंजन करतो आहोत अशी भूमिका मला दिसू लागली होती. मला उत्तम नर्तन, उत्तम गाणं हे उत्तम शिक्षण आहे असंच वाटतं. आपण संस्कृतीच्या गोष्टी करतो.. दुसऱ्याला आनंद देणं हीच संस्कृती आहे. माझं मन तिथे रमलं नाही म्हणून मी ते काम सोडलं असं पुलंनी सांगितलं होतं.

आज आपल्या लाडक्या पुलंची जयंती. त्यांच्या नावापुढे अनेक बिरुदं लागली. कोट्यधीश पुलं, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व, भाई, भाई काका फक्त एकच बिरुद आपल्या सगळ्यांना नकोसं वाटलं ते म्हणजे कैलासवासी पुलं. आज ते आपल्यात नसले तरीही त्यांचं लिखाण आहे..त्यांनी सांगितलेल्या कथा ऑडिओ आणि व्हिडीओ रुपात आहेत. माझं साहित्य एखाद्या तरुणाने वाचलं तर मी आणखी पन्नास वर्षे जगलो असं मला वाटतं असं पुलं एकदा म्हणाले होते. तसंच आहे.. पुलं शरीराने आपल्यात नाहीत.. मात्र त्यांचा साहित्यरुपी सहवास आपल्या मनात कायम दरवळतो आहे यात शंकाच नाही.

मूळ स्रोत - https://www.loksatta.com/maharashtra/in-a-live-interview-pandit-nehru-was-angry-p-l-deshpande-sent-a-question-and-then-what-was-that-story-read-in-detail-scj-81-4034606/

Friday, May 23, 2025

उदंड पहिले पाणी !

मला पाण्याचं व्यसन आहे. एखाद्या गावाला नदी आहे, म्हटल्यावर मला ते गाव न पाहताच आवडायला लागतं. वास्तविक जीवघेण्या उन्हाळ्याच्या ह्या देशात पाण्याचं केवढं आकर्षण पाहिजे !

पाण्याच्या आनंदाला आपण कमी मानतो, असं नाही. देवाचीदेखील बिनपाण्याने पूजा नाही करता येत. लग्नातल्या मंगळाष्टकांत गंगा सिन्धु सरस्वती च यमुना म्हणून सगळ्या नद्यांना हाका घालतो. स्त्रतःच्या संस्कृतीला सिंधु-संस्कृती, गंगा-संस्कृती अशी नावे देऊन नद्यांचे उपकार आठवतो. पण वन्दे मातरम् सुरू झालं की 'सुजलाम्' म्हणताना जीभ अडखळते. डोळ्यांपुढे त्या पाण्याच्या नळासमोर लागलेल्या न संपणाऱ्या रांगा दिसायला लागतात. दिवसाच्या आणि रात्रीच्या कुठल्याही वेळी पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या बाया दिसू लागतात. नळावरची भांडणे करणाऱ्या 'सुहासिनी सुमधुरभाषिणी' आठवतात. मुंबईतल्या नळातून किरंगळीच्या मापाची धार गळायची तासन् तास प्रतीक्षा करणारी एक माउली अमेरिकेत नोकरीला असलेल्या आपल्या लेकाला भेटायला गेली. परतल्यावर अमेरिकेचं कौतुक सांगत होती "अहो, तिथली श्रीमंती म्हणजे काय सांगू ? अहो विश्वास बसणार नाही तुमचा ऽ ऽ नळाला दिवसभऽऽर पाणी ".

प्रत्यक्षात आम्हांला पाण्याची गरज असून किंमत नाही असा चमत्कारिक विरोधाभास आहे. वास्तविक आम्ही वृक्षपूजक, जलपूजक, दगडाधोंड्यांचे आणि मातीचेदेखील पूजक. पण स्त्रीला जशी एका तोंडाने 'देवता' मानून संसारात खुशाल झिजवून मारून टाकतो, तसेच आपण आपल्या जळा-स्थळा-काष्ठा-पाषाणांचे केले! नुकतेच मी गिरसथाचा धबधबा आटून नाहीसा झाल्याचे वाचले, आपल्या एखाद्या आवडत्या कलावंताच्या निधनाच्या बातमीने धक्का बसावा, तसे मला झाले. त्या गिरसभाच्या सान्निध्यात दोनच दिवस होतो मी. काय एकेक लीला दाखविल्या होत्या त्याने ! त्या दोन दिवसांत मी पावसाच्या धारांतला गिरसण्या, धुक्यातला गिरसप्पा आणि सूर्यकिरणांत अंगावर एक नाही तर दोन इंद्रधनुष्ये घेऊन नाचणारा गिरसष्पा पाहिला होता.

- पूर्वरंग

Wednesday, March 12, 2025

चांदणे तुझ्या स्मरणाचे - (वरुण पालकर)

८ नोव्हेंबर हा पु.लं. चा म्हणजे भाईंचा वाढदिवस. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप. भाईंना जाऊन आज 19 वर्ष झाली, पण ते गेल्यापासून आजवर कधीही त्यांच्या वाढदिवसाला मी जयंती म्हणालो नाहीये. कारण भाई म्हणजे "महाराष्ट्राच्या अंगणातील कैवल्याचं, आनंदाचं झाड!!", त्यामुळे ते कधी सुकणं, नष्ट होणं शक्य नाही!!या वर्षाच्या सुरुवातीला "भाई-व्यक्ती की वल्ली" हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील काही संवाद आणि काही पात्रांची निवड खटकणारी होती. तसेच Cinematic liberty घेऊन दाखवलेले काही सीन्स अत्यंत आक्षेपार्ह होते. त्यामुळे पूर्वार्ध पाहून "चांदणे तुझ्या स्मरणाचे" या नावाने पहिला भाग 9 जानेवारी रोजी लिहिला. आणि उत्तरार्ध बघून दुसरा भाग टीकात्मक पद्धतीने लिहिणार असं खरंतर ठरवलं होतं, पण काही केल्या लिहिताच आला नाही. भाई आणि सुनीताबाई म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव. या दोघांनी मला आनंदाच्या आणि संस्काराच्या रुपाने एवढं दिलंय की त्याचं ओझं झटकून त्यांच्यावर आधारित चित्रपटावर टीका करायला, त्यातील उणिधुणी काढायला मी धजावलोच नाही. कधी कधी आयुष्यात काही लोकं तुम्हाला असे वश करतात की ते गेल्यानंतरही त्यांची मोहिनी तुमच्यावर कायम असते. भाई आणि माईंच्याबाबतीत माझं नेमकं हेच झालं, असं म्हणता येईल. त्यामुळे आज दहा महिन्यांनी हा दुसरा भाग पूर्ण करुन, या पुण्यवंत उभयतांचे आणि आमचे ऋणानुबंध यांना उजाळा देऊन अंतःकरणापासून आदरांजली वाहण्याचा हा अगदी छोटा प्रयत्न.


आमच्या आजी आजोबांचा आणि पुलं-सुनीताबाईंचा तसा जवळपास 5 दशके जुना परिचय. आणि तो होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सुनीताबाईंच्या धाकट्या भगिनी कै. शालनताई पाटील!! तेव्हा जोशी हॉस्पिटल शेजारी रुपाली अपार्टमेंटमध्ये भाई आणि माई राहत असत. रोजच्या रोज पत्र, फोन आणि माणसांची वर्दळ!! पण या सर्व वैतागाला लगाम घालायला सुनीताबाईंसारखी खमकी गृहिणी कम सचिव होतीच. मग कधीतरी जरा निवांतपणा मिळावा म्हणून लॉ कॉलेज रोडवरील शालनताईंच्या अबोली अपार्टमेंटमधील घरात दुपारच्या चहापानासाठी अथवा रात्रीच्या भोजनासाठी पुलं-सुनीताबाई येत असत. अशाच एका भोजनप्रसंगी पालकर उभयतांची ओळख झाली मग "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी" यानुसार या मंडळींमध्ये "जननांतर सौहृद" निर्माण झालं,टिकलं ते अगदी सुनीताबाई जाईपर्यंत. सुनीताबाई पक्क्या नास्तिक,पुलंही अजिबात दैववादी नव्हते. त्यामुळे त्यांनी ना घरात कधीही देव ठेवले की ना कुठली कार्यही केली. पण नातेवाईकांच्या, आप्त-स्नेह्यांच्या मंगलकार्यात त्या नुसत्या उपस्थित राहत नसत, तर संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पडेल ते सर्व करण्याची, प्रसंगी पदरचे पैसे खर्च करुन(ज्यांचे कार्य आहे त्यांच्याकडील कोणाला कळू न देता) यथाशक्ती मदत करीत असत. आमच्या बंगल्याची वास्तुशांत, आत्या आणि बाबांचं लग्न, प्रणवचं बारसं, माझी मुंज आदी सर्व शुभप्रसंगी पुलं-सुनीताबाई जोडीने अथवा सुनीताबाई तरी आवर्जून उपस्थित होत्या. माझ्या मुंजीत भाईंच्या सर्व पुस्तकांचा संच सुनीताबाईंनी भेट दिला होता, जो आजही मी जीवापाड जपून ठेवला आहे.

सततचे दौरे, अविश्रांतपणे केलेले नाटकाचे, अभिवाचनाचे प्रयोग यामुळे जसा भाईंच्या मेंदूवर ताण आला तसाच ताण सततचे दौरे, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठका, फायली आणि आपल्या आवडत्या व्यक्तींच्या लागोपाठ जाण्याने आमच्या आजोबांच्या मेंदूवर आला. साधारणपणे एका वर्षाच्या अंतराने 1993 साली पुलंना, आणि 1994 च्या शेवटी आजोबांना Parkinson's विकाराने ग्रासले.मग डॉ.चारुदत्त आपटे, डॉ.प्रदीप दिवटेंकडे उपचार सुरू झाले. त्यानिमित्त तरी भेट व्हावी म्हणून दोघेही पुढे मागे येईल अशीच अपॉइंटमेंट घ्यायचे. त्यात आमचे आजोबा मितभाषी, जरुरीपेक्षा जास्त न बोलणारे असे होते. त्यामुळे आपल्याला हा आजार झालाय, आपण परावलंबी होत चाललो आहोत या भावनेने उचल खाऊन आजोबा अंतर्मनात खचू लागले. पण त्या उलट पुलंनी आपल्या आजाराचीही टिंगल करायचे. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाताना जेव्हा आमच्या बापूंच पाऊल पुढे पडायचं नाही त्यावेळेस चेष्टेच्या स्वरात पुलं त्यांना म्हणायचे, "अरे प्रताप, तू माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहेस, त्यामुळे पहिला मान माझा. पण इथे आपण उलट करू. तू पहिले आत जा. हं, टाक पाऊल, जमेल तुला. अरे तू एरवी भराभर चालतोस की. माझ्यासारखा स्थूल थोडीच आहेस?" असे एकावर एक विनोद करत पुलं बापूंच्या मनावरचा ताण थोडा हलका करीत. अशीच 2-3 वर्ष गेली. एव्हाना बापूंच्या पूर्ण शरीराचा ताबा Parkinson's ने घेतला होता. दिवसातून दोन वेळा सर्व शरीराला कंप सुटायला लागला, मग साधारणपणे 1998 पासून पूर्ण शरीराला या आजाराने विळखा घातला. यातून तात्पुरती सुटका म्हणून बापू दिवसातून 2 वेळा झोपेच्या गोळ्या घेऊ लागले. यामुळे जास्तीतजास्त काळ बापू झोपूनच राहायचे. इकडे पुलं अमेरिकेला जाऊन मेंदूतल्या पेशींवर शस्त्रक्रिया करून आले,ज्याने त्यांचा त्रास कमी होण्याची अपेक्षा होती, पण त्याचा परिणाम अल्पकाळ टिकला. मग पुलंही wheelchair ला खिळून गेले. बाहेर फिरणे, कार्यक्रमाला जाणे, सगळं सगळं बंद झालं. शेवटचा प्रवास पुलंनी केला तो 1999 साली आनंदवनाचा. तिथे "बाबांच्या सोबत जर मी दोन पाऊलं जास्त चालू शकलो तर माझं आयुष्य वाढेल" या भावनेने जवळपास महिनाभर पुलं तिथे राहिले.

आता आयुष्याचं अंतिम वर्तुळ पूर्ण करण्यासाठी काळाचं चक्र फिरू लागलं. मार्च 2000 च्या शेवटच्या आठवड्यात बापूंना न्यूमोनिया झाला. Parkinson's विकाराचा शेवट न्यूमोनियानेच होते याबद्दल डॉ.आपटेंनी आमच्या बाबांना 1995 लाच कल्पना दिली होती. त्यामुळे हे शेवटचे आजारपण हे बाबा समजून चुकले आणि त्यांनी हळूहळू आजीसह बापूंची बहीण, माझी आत्या सर्वांच्या मनाची तयारी करायला सुरुवात केली. आणि अशातच मे च्या पहिल्या आठवड्यात पुलंना देखील न्यूमोनिया सदृश फुफुसांचा आजार झाल्याचे सुनीताबाईंनी कळवले. तेव्हा मात्र आमच्या घरातल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आता भाईदेखील त्याच वाटेचे प्रवासी या विचाराने आजी आणि बाबांना अश्रू अनावर झाले. बाबा आणि आजी भाईंना भेटून आले. भाईंनी स्मित केलं पण आवाज खूप खोल गेला होता. 1 मे रोजी डॉक्टरांच्या साप्ताहिक भेटीत बापूंना dehydration झाल्याचे निदर्शनास आले. शरीरात पाणी राहिना. कातडी ओढली की तशीच वर राहू लागली. शरीरातला जोम दिवसागणिक कमी होत गेला, डोळे खोल गेले. डॉक्टरांनी औषधे बंद करण्यास सांगितली. त्यांचा शेवटचा दिस गोड करा, ते मागतील ते द्या, असा जवळच्या आप्तासारखा सल्ला त्यांनी बाबांना दिला. बापूंची प्रकृती अत्यावस्थ आहे हे समजल्यावर 11 मे रोजी सकाळी सुनीताबाई शहाळी घेऊन आमच्या घरी आल्या. बापू तर ग्लानीतच होते. मग सहज बोलता बोलता आजी म्हणाली की गेले 2 महिने यांच्या आजारपणामुळे यांचं आणि माझं पेन्शनच आणायला जमलेलं नाही. झालं!! आजी बोलायचा अवकाश आणि सुनीताबाई आजीला गाडीत बसवून पेन्शन आणायला घेऊन गेल्या. अर्ध्या तासाने परत आणून सोडलं. मग निघताना मला एक चॉकलेट दिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला.

दुसरे दिवशी 12 मे रोजी सकाळी बापू गेले. 11 वाजता सुनीताबाई आल्या. मी दारातल्या जिन्याच्या पायरीवर बसून हमसून हमसून रडत होतो. मला जवळ घेत त्यांनी माझे डोळे पुसल्याचं आजही मी विसरु शकत नाही. मग बरोबर महिन्याने 12 जून रोजी पुलं गेले. जणू महाराष्ट्राचा "आनंद-पारिजात"च कोमेजला!! त्याच दिवशी पुलं-सुनीताबाईंच्या लग्नाचा 54 वा वाढदिवस असणे हा एक विचित्र योगायोग म्हणायला हवा. मी लहान असल्याने मला हॉस्पिटलमध्ये तर नेलं नव्हतंच, पण घरीही नेलं नव्हतं. मात्र संध्याकाळी मी रडून घर डोक्यावर घेतलं म्हणून आई-बाबा मला पुढ्यात बसवून "मालती-माधव" मध्ये पुलंच्या घरी घेऊन गेले. मी आत गेलो तोच मला सुनीताबाई दिसल्या. मी मूकपणे रडत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. आणि एका क्षणी मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागलो. माझं रडणं ऐकून आई बाबा तर रडलेच, पण सुनीताबाईंचे डोळेही पाझरले. माझ्या पाठीवरून हात फिरवत, मला धीर देत त्यांनी माझं रडू आवरलं.

पुलं गेले तेव्हा मी फक्त 10 वर्षांचा होतो. मी जे पुलं पाहिले ते wheelchair वर बसलेले, दाढी वाढलेले, मऊ सुती बंडी आणि हाफ चड्डी घालणारे आणि खोल गेलेल्या आवाजामुळे शांत बसलेले असे पुलं पाहिले होते. पण सुनीताबाईंचा सहवास मला अगदी 2008 पर्यंत लाभला. या उभयतांनी महाराष्ट्राला खूप दिलं. पुलंनी लोकांना हसवलं, आणि त्यातून जे कमावलं त्याचा विनियोग सचोटीने करत, अनेक प्रामाणिक कष्टाळू संस्थांना भरघोस मदत करत सुनीताबाईंनी दातृत्वाचा एक अतुलनीय वस्तुपाठ महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यक्षेत्रात घालून दिला. काल सुनीताबाईंची ११ वी पुण्यतिथी झाली. आयुष्यात जास्तीतजास्त आनंद शोधून तो इतरांनाही द्यावा, हे मला भाईंनी शिकवलं, तर कसोटीच्या क्षणी कसं निकराने लढावं, खचून न जाता कणखरपणे कसं उभं राहावं, याचे धडे मी सुनीताबाईंपाशी गिरवले. माझा स्वभाव आवडल्याने ज्यांनी मला आपलंसं केलं, त्या स्वभावाचे कंगोरे घासून लख्ख करण्यात पुलं-सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे. कुबेराचं कर्ज तिरुपतीचा स्वामी व्यंकटेश्वर अजून फेडतो आहे असं म्हणतात, तद्वत या साहित्यिक कुबेराचे समस्त मराठी जनांवर असलेले ऋण शेवटचा मराठी माणूस या पृथ्वीवर असेपर्यंत फिटणार नाहीत, हे अलबत.

©वरुण पालकर
पुणे

Wednesday, March 5, 2025

सुखाची जागा

स्वातंत्र्य आणि साहित्य हे नेहमी आत्मतेजोबलाने उभं राहत असतं. टेकू देऊन उभे राहतात ते राजकारणातले तकलादू पुढारी. हे महाराष्टाचे अमके अन् तमके! सीटवरून खाली आले की मग कोण? साहित्यात असं होत नाही. शेकडो वर्षांपूर्वी झालेला तुकाराम आजही आपल्या मदतीला येतो. कालिदास आजही आपल्याला आनंद देऊन जातो. भवभूती, शेक्सपिअर, टॉलस्टॉय, आमचे ज्ञानेश्वर आजही आपल्या मनाला शांती आणि आनंद देऊन जात असतात.

प्रतिकूल परिस्थिती सर्वांनाच असते. श्रीमंत लोकांकडे तुम्ही गेलात तर त्यांच्याकडे अपचनाचं दुःख असतं आणि गरिबांकडे गेलात तर उपाशीपणाचं दुःख असतं. पोटाचीच दोन्ही दुःखं. उलट एखादा मनुष्य म्हणतो - मी मजेत आहे. तो तेव्हाच मजेत असेल जेव्हा अवघ्या जगाचं सुखदुःख हे त्याला आपलं आहे असं वाटत असेल! साहित्यिकाची हीच भूमिका आहे. अशा या भाषेतून फुलोरा फुलवणं हे तुमचं काम आहे. तो निरनिराळ्या तन्हेनं फुलवा. कुठलीही सक्ती लादून घेऊन नका. साहित्य अनेक तऱ्हेने फुलते.

एक गोष्ट आहे - एका हॉस्पिटलमध्ये एका खोलीत दोन पेशंट होते. एकाला खिडकीजवळची जागा होती अन् दुसऱ्याला आतल्या बाजूची. दोघेही सीरियसच होते. खिडकीजवळची जागा ज्याला होती तो त्यातल्या त्यात बरा होता. तो खिडकीच्या बाहेर बघायचा अन् या पेशंटला सांगायचा; 'बरं का, काय सुंदर फुलबाग आहे इथं. बाहेर काय सुरेख फुललं आहे. सुंदर प्रकाश आहे, मुलं खेळताहेत, फुलं काय सुरेख आली आहेत.' असं तो वर्णन करून सांगायचा. दुसऱ्याला सारखं वाटायचं, ही जागा मला मिळायला पाहिजे होती. कधीतरी ती कॉट मला मिळावी. हा बरा तरी होऊ दे नाहीतर मरू दे तरी।

आणि एके दिवशी सकाळी काय झालं. तो जो नेहमी वागेचं वर्णन करून सांगणारा होता तो मनुष्य मेला लगेच दुसऱ्याने उत्साहाने डॉक्टरला सांगितले की, 'चला, मला त्या कॉटवर न्या.' डॉक्टर म्हणाले, 'नको. तिथं कशाला !' तरी तो म्हणाला, 'तिथेच मला जागा द्या' डॉक्टरनी नाइलाजानं त्याला तिथं झोपवलं. उत्साहाने त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. तर तिथं बाग नव्हती. काही नव्हतं. तिथे एक कबरस्तान होतं. तो याला बरं वाटावं म्हणून बागेचं वर्णन करून सांगायचा.

साहित्यिकाचं हेच काम आहे. जीवनात अनेक दुःखं असतात आणि, 'वाबारे, इतकी दुःखं असली तरी जीवन इतकं वाईट नाही. जीवनामध्ये अजूनही चांगलं होणार आहे. हे सांगणं साहित्यिकाचं काम आहे. जीवनावर माणसाचे अतोनात प्रेम आहे. टॉलस्टॉयची एक गोष्ट आहे - एक माणूस असतो. त्याच्यामागे वाघ लागतो. हा धावत धावत जातो. कोठे तरी झाडावर चढायला बघतो. जे झाड दिसतं ते काटेरी असतं. तरी तो कसा तरी वर चढतो. वर चढायला लागल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की, वाघ यायला लागला आहे आणि आपणाला खायला एक अजगर आणखी वर त्या झाडावर चढतोय. आता काय करावं? कळत नाही. तो आणखी वरती जाण्याचा प्रयत्न करतो पण तिथे मधाचे पोळे असते. त्या मधाच्या पोळ्याला धक्का लागतो आणि मधाचा एक थेंब त्याच्या खांद्यावर पडतो. या सगळ्या गडबडीत तो ते चाटून घेतो. जीवनात इतक्या संकटांमध्ये मधाचा एक थेंब आपण चाटून घेत असतो. कोठेतरी एक एवढीशी सुखाची जागा आपण ठेवलेली असते. ही सुखाची जागा मला एकट्याला न मिळता सगळ्या समाजाला मिळावी असे जेव्हा वाटायला लागते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो.

पु. ल. देशपांडे
साहित्य सेवा मंडळ, विटा, यांनी आयोजित केलेल्या ग्रामीण साहित्य सम्मेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही अंश.. (२४-१-१९८२)
पुस्तक – मित्रहो
a