"हा तू काय सूर लावला आहेस? रडका, तुझ्या पिंडाला न शोभणारा. एवढेसे दुखणे ते काय, त्याच्यापुढे अशी शरणागती ?... या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात या प्रयोजनाला तरी काही अर्थ आहे का? गांधींच्या प्रयोजनाचे काय झाले? आणि ख्रिस्ताच्या? सुदैवाने नक्षत्रदर्शनाची हौस असलेल्या डॉक्टर मंडळींच्या संगतीत आहेस, तर त्यांच्या दुर्बिणीतून एकदा पाहा तरी. पृथ्वीसारखी जीवसृष्टी असलेले कोट्यवधी ग्रह त्या पसाऱ्यात असतील. काही ठिकाणची जीवसृष्टी तर इतकी प्रगत- की आपला आइनस्टाईन तिथे आदिमानव ठरावा. आणि एखाद्या धूमकेतूच्या शेपटाचा फटकारा सोड, पण नुसता वारा लागला तरी असे ग्रहही होते की नव्हते होऊन जातात.
तिथे कसले प्रयोजन घेऊन बसलास ? आणि प्रयोजन नाही म्हणजे तरी काय? या पसाऱ्याची गंमत पाहत, सुख-दुःखापासून जरा अलग होत त्यांच्या पाठशिवणीचा खेळ पाहत. पुस्तकं-संगीत-निसर्ग वगैरेच्या संगतीत चिंतनशील आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करणे हेच प्रयोजन असू नये म्हणून कुणी सांगितलं? अगदी पायाचे दुखणंच म्हटले तरी वर्षानुवर्षे तक्रार न करत मी कसं सहन केलं असेल? मुळात काही नसलेल्या आणि जे चिमुटभर होत असेल तेही वाया गेलेल्या आयुष्याच्या अस्पष्ट होत चाललेल्या पसाऱ्यातून तृप्तीचे क्षण निवडत बसणे हेही जर प्रयोजन होऊ शकते, तर तुला काय कमी आहे?
गुढघा हा शरीराचा एवढासा भाग. त्याच्या एवढ्याशा दुखण्याने साऱ्या शरीराला आणि मनाला अशी मरगळ येऊ देणं म्हणजे त्या गुढघ्यांची एकतऱ्हेची हुकुमशाही मानणेच आहे. तेव्हा या गुढघ्यांचे कौतुक पुरे झालं. तू ठरल्याप्रमाणे ये, आपण परत तिकडे जाऊ, ट्रीटमेंटचं निमित्त, पण मुख्य म्हणजे काहीतरी ठरवलंय ते उघड्या माळाच्या नि आकाशाच्या आणि सुंदर सुंदर पुस्तकांच्या संगतीत शोधून काढू, 'इनफ ऑफ घिस, कॉमरेड, कम ऑन..."
(दिनेश ठाकूर यांच्या लेखामधून: आणखी पुलं लोकसत्ता विशेषांक)
(दिनेश ठाकूर यांच्या लेखामधून: आणखी पुलं लोकसत्ता विशेषांक)














