Wednesday, June 24, 2026

सुनीताबाईंचा 'डोडी'

फोटोत सुनीता बाई आपल्या आवडत्या डोडी बरोबर आहेत. त्यांच्या नावाने त्यांनी प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी पण दिली होती. 


"मण्यांची माळ" या पुस्तकात सुनीता बाई नी डोडी च खूप छान वर्णन केलं आहे.

त्यातलाच काही अंश "डोडी खरोखरंच देखणा कुत्रा आहे. काही कुत्री केसाळ असतात. त्यांच्यासारखे डोडीचे केस खूप लांब नाहीत. बेताचेच लांब आहेत. सोनेरी रुपेरी काळसर असं काहीसं रंगाचं सुंदर मिश्रण असलेले केस, चकलीसारखी, सदैव गोल गोल गुंडाळलेली शेपटी, आपल्यातलं कुणी आल की पंख्यासारखी ती चकली हलवत ठेवत आनंद व्यक्त करण्याची व्यक्त करण्याची तह, त्याचं रुसण, सर्व काही मला मोहून टाकतं. रांगत्या मुलाची लाळ गळत असते, तरी आपल्याला ती मुलं अस्वच्छ वाटतं नाहीत, त्यांना उचलून घ्यावं, त्यांचे पापे घ्यावे, असाच काही तरी निरागस भाव त्यांच्या त्या उघड्या तोंडावर असतो. डोडीच्या बाबतीत माझी तशीच गत होते."

-मधुरा कुलकर्णी


‘पुल’कित स्पर्श (संदीप गजानन श्रोत्री)

आम्ही २१ सप्टेंबर १९८४ या दिवशी थंडीत कुडकुडत पण छातीत धडधडत सकाळी सात वाजता पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील ‘रुपाली’ अपार्टमेंट मधील एक नंबरच्या फ्लॅट समोर उभे होतो. बेल वाजवली. दरवाजा उघडला तो डॉ. जब्बार पटेल यांनी. तीन खोल्यांचा तो फ्लॅट, आत हॉलमध्ये एका सोफ्यावर जाड काड्यांचा चष्मा आणि शेवाळी-हिरव्या रंगाचा स्वेटर घालून ‘पुल’ अर्थात ‘भाई’ बसले होते, समोर बालभारती संस्थेचे काही अधिकारी बसले होते. थेट मिरजहून सह्याद्री एक्स्प्रेसने आलो, असे समजून सुनिताबाईनी आम्हाला स्वैपाकघरात बोलावले. चहा-पाणी, नाष्टा आमचे तिथेच झाले.

त्या दिवशी लोकसभेसाठी मतदान होते. त्यामुळे पुलंना मतदानासाठी नेण्याची राजकीय कार्यकर्त्यांची धावपळ चालू होती. पुलंची ती बैठक तब्बल चार तास चालली होती. त्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर बसलो. ‘पुलं’पेक्षा सुनीताबाई आमच्याशी कार्यक्रमाच्या तपशिलाविषयी सांगत होत्या. कार्यक्रम होता, ‘एक आनंदयात्रा कवितेची’. आम्ही दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचा प्लॅन घेऊन गेलो होतो. त्यांनी सगळी माहिती आमच्याकडून घेतली. कार्यक्रमाचे बारकावे, येणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा विचारल्या. आम्हाला काही सूचना केल्या. कार्यक्रम कवितेचा असल्यामुळे ‘लहान मुलांना प्रवेश नाही, प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाल्यावर कोणाला आत किंवा बाहेर ये-जा करता येणार नाही, मुख्य म्हणजे कार्यक्रमाचे तिकीट दहा रुपयांपेक्षा जास्त लावायचे नाही, विलीन्ग्डन कॉलेजच्या मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे’, या त्यापैकी काही प्लॅनवरील अगोदरच केलेल्या लाल फुल्या बघून त्यांनी चौकशी केली. त्या खुर्च्या नगरपालिका, पोलीस आणि कलेक्टर यांच्यासाठी राखीव आहेत असे सांगितल्यानंतर पुलंनी कपाळावर हात मारून घेतला होता आणि म्हणाले, “एखादी सुंदर स्त्री आपल्याकडे पाहताना मध्येच हसली आणि तिचे पुढचे चार दात पडलेले दिसावेत, तसे पडदा उघडला आणि भरगच्च सभागृहात पुढच्या चार-पाच रांगेतील या ‘सरकारी’ रिकाम्या खुर्च्या पहिल्या कि व्यासपीठावरून आम्हाला वाटते”, अशी एक परफेक्ट कॉमेंट केली होती. तब्बल सात तास आम्ही त्यांच्या घरी होतो. शेवटपर्यंत त्यांनी मानधनाचा विषय काढला नाही. शेवटी मीच भीतभीत त्यांना विचारले. त्यावर सुनिताबाईनी ‘तुमचा सगळा खर्च वजा जाता उरलेली रक्कम द्या’, असा धक्कादायक आणि तितकाच आनंददायक बॉम्ब टाकला. आम्हाला त्यांचे मानधन लाखाच्या घरात (१९८४ साली) असते एवढेच माहित होते. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो, पण झाले उलटेच. मोठ्या आनंदांत आम्ही मिरजला आलो. तारीख ठरली होतीच. कार्यक्रमाचा आणि संपूर्ण दिवसाचाच अक्षरशः ‘मिनिट टू मिनिट’ तपशील काढला. पुल-सुनिताबाईना आणण्यासाठी कोल्हापूरला आदल्या दिवशी आम्ही जाणार होतो. त्याच दिवशी त्यांचा तेथील हाच प्रयोग बघणार होतो. आम्ही त्यांच्यासाठी आमच्या कॉलेजपलीकडील ‘गेस्ट हाउस’ मधील एक ‘सूट’ आरक्षित केला होता. तिथेच सर्वाना रात्रीचे जेवण होते.
 
प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख होती ३१ जानेवारी १९८५, परंतु त्यादिवसाच्या कितीतरी अगोदर आम्ही तयारीला लागलो होतो. सर्वात कटकटीचा आणि डोकेदुखीचा मुद्दा होता तो तिकीट वाटपाचा. तिकिटे विकली जाणे हा मुद्दाच नव्हता. ती कोणाला किती द्यायची हाच खरा प्रश्न होता. प्रत्येक डॉक्टरला जादा पासेस हवे होते. आम्ही प्रत्येकाला जास्तीतजास्त फक्त दोन तिकिटेच द्यायची असा निर्णय घेतला. भाईंच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही खरेच विलिंग्डन कॉलेजमध्ये गेलो, तिथे प्राचार्यांना भेटून एम.ए.मराठी च्या विद्यार्थ्यांना तिकिटे घ्यायला लावली. शांताबाई किर्लोस्कर, प्रा.दिलीप परदेशी, अंधकवी राम गोसावी, औदुम्बरचे कवी सुधांशू, आदी कितीतरी मान्यवर या कार्यक्रमाला येणार होते. त्यावेळच्या जिल्हाधिकारी सौ.लीना मेहेंदळे, पोलीस अधीक्षक श्री पुरुषोत्तम जाधव हे साहित्यरसिक होतेच. परंतु त्यांनासुद्धा आम्ही जादा तिकिटे देऊ शकलो नाही. माझ्या खोलीवरच सगळी तिकिटे विकली गेली होती. दीनानाथ नाट्यगृहासमोर तीन दिवस अगोदर तिकिटासाठी रांग लागलेली आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तिकिटे न मिळाल्यामुळे अनेक रसिकांचे शिव्याशाप आम्ही त्या काळी घेतले होते. अनेक ‘व्हीआयपी’चा दबाव आम्ही झुगारून लावला होता. कॉलेजच्या प्राध्यापकांनी सुद्धा आम्हाला आग्रह किंवा आमच्यात ढवळाढवळ केली नाही. डॉ. दयानंद नाईक माझ्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीर उभे होते. डॉ.दत्ता कुंभार यांच्याकडे छायाचित्रे काढण्याची जबाबदारी होती.
 

कार्यक्रम सुरु होण्याच्या अगोदर एक तास भाई आणि सुनीताबाई दीनानाथ नाट्यगृहात आले. व्यासपीठावर भाई बसले आणि सुनीताबाई त्या नाट्यगृहाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जावून आवाज व्यवस्थित येतो का त्याची खात्री करत होत्या. भाईनी त्यावेळी ‘चपल तुझे चरण जरा’ हि कविता गायली होती. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर फोटो काढायला परवानगी नव्हती. कार्यक्रमाचे रेकोर्डिंग करण्यासाठी कोल्हापूरहून इच्छुक लोक आले होते परंतु भाईनी त्यांना विनम्र नकार दिला होता. प्रचंड गर्दी बाहेरच्या आवारात झाली होती. पोलीस व्यवस्था चोख होती. बाहेर जादा माईकची सोय केली होती. आमच्या कार्यकारिणीतील वर्गमैत्रिणी वर्षा शिराळकर (काणे), किमया शहा, विनिता बहेकर (कुलकर्णी) यांनी फार मोठी जबाबदारी मोठ्या हौसेने पार पाडली होती. नाट्यगृहात उपस्थित असणाऱ्या सर्व स्त्रीवर्गाला गजरे देवून आणि अत्तरदाणी-गुलाबदाणीच्या पाण्याचा शिडकावा करून वातावरण सुगंधी केले होते. कार्यक्रम सुरु झाला त्यावेळी मधु गानू हे भाईंचे मित्र आणि सहाय्यक, मी आणि धनंजय खानोलकर विंगेतच होतो. ध्वनिव्यवस्था श्री आठवले यांच्याकडे होती. कार्यक्रम बरोबर दिड तास चालला. आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो.

कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर जमलेल्या लोकांना त्यांच्या विनंतीवरून मागील दरवाज्याने पुलंचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आत सोडले होते आणि पुढील दरवाज्याने आतील लोकांना बाहेर सोडले होते. त्या गर्दीतून भाई माझ्या खांद्यावर हात ठेवून बाहेर गाडीत आले होते. रात्रीचे भोजन म्हणजे तर एक वेगळा समारंभच होता. भाईंच्या आवडीचे मासे गोव्यावरून मागवले होते आणि हेल्थ रेझोर्टचे श्री सामंत या ‘सारस्वतां’कडून बनवून घेतले होते. त्याला भाईनी सुद्धा दाद दिली होती. त्यानंतर ‘फोटोसेशन’ झाला. मानधनाचे पाकीट त्यांच्या हाती देताना त्यांनी ‘किती रुपये आहेत?’, ते न विचारता पुन्हा पुन्हा ‘सर्व खर्च वजा केला का?’ ते विचारले. रात्री अकरा वाजता रेल्वे स्टेशनवर सह्याद्री एक्स्प्रेसच्या पहिल्या वर्गाच्या डब्यामध्ये त्या दोघांना बसविले. पाया पडून त्यांचा आशीर्वाद आणि निरोप घेतला. आणि मिशनच्या चौकात सायकली पळवत आलो ते थेट कुमारच्या टपरीवर शांतपणे चहा प्यायला. एक स्वप्न पूर्ण झाले होते. खरे म्हणजे आजही त्या स्वप्नातून बाहेर यावेसे वाटत नाही.

पुढे भविष्यात ‘पुलं’ची सुद्धा दोन वेळा गाठ पडली, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज भेटले. परंतु मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्या दीड वर्षातील त्या आठवणी आजही तशाच लख्ख ताज्या आहेत. अत्तराच्या कुपिमध्ये त्या हृदयात बंद आहेत, केंव्हातरी वाऱ्याची झुळूक येते, ती कुपी थोडीशी उघडली जाते. आतील पुलकित आठवणीरुपी अत्तराच्या सुगंधी वासाने तन आणि मन धुंद होते. ओठावर ‘गदिमां’ची मला अत्यंत आवडती ओळ येते,


“लुटुनी नेसी काय काळा, सौख्य माझे मागले, भोगले ते भोगले”.
 
- डॉ. संदीप गजानन श्रोत्री, एम.एस.

Monday, April 20, 2026

मोठ्यांच्या गोष्टी - (दिलीप प्रभावळकर)

..पुलंच्या वेळी असंच झालं. माझ्या मनात, डोळ्यांसमोर त्यांची प्रतिमा होती एका परफॉर्मरची. त्यांचं एवढं साहित्य (पुनःपुन्हा) वाचूनही त्यांच्या 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात' या कार्यक्रमांचा विलक्षण प्रभाव पडल्यामुळे आकाराला आलेली प्रतिमा... त्यांच्या विविध क्षेत्रांतल्या असामान्य कामगिरीमुळे आणखी पक्की झालेली.

त्यांच्या 'बटाट्याची चाळ' या बहुरूपी कार्यक्रमाचा प्रभाव तर इतका होता की मला तो एक 'चमत्कार' वाटला. एक कलाकार तीन तास प्रेक्षकांना खिळवून कसा काय ठेवू शकतो याचं मला मोठं नवल वाटलं होतं. आपणही असं काही करायला हवं वाटण्याऐवजी, हेच करायला हवं असं वाटलं. आणि मी पुलंचा प्रयोग पुन्हा पुन्हा पाहून आणि 'बटाट्याची चाळ' मधले लेख वाचून त्यातला 'भ्रमण मंडळ' हा भाग चोख पाठांतर करून आमच्या हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात सादर केला. त्याचं कौतुक झालं. माझ्या अंगात उत्साह संचारला! मला वाटलं, आता कोणी सांगितलं, बोलावलं की करून दाखवायला हरकत नाही. 'दाभोळकर ऑप्टिशियन' आमच्या कॉलनीत राहायचे. त्यांच्या दुकानात जाऊन मी पुलंसारखा चष्माही करून घेतला. कॉलनीतल्याच एकदोघांनी मला त्यांच्या ऑफिसच्या वार्षिक समारंभाला हे सादर करायला बोलावलं. मग एकदा आमच्यासमोर राहणाऱ्या एका वकिलांनी मला विचारलं, 'काय रे तू पुलंना भेटलायस का?' 'नाही हो. फार इच्छा आहे. पण कसं जाणार?' 'मग हे त्यांचं भ्रमण मंडळ कसं करतोयस? परवानगी घेतली आहेस?' मला यासाठी परवानगी घ्यायची असते याची कल्पना नव्हती. 'सुनीताबाई केस करतील,' त्यांनी इशारा दिला. माझ्या उत्साहाला तात्काळ ब्रेक लागला. (मी चष्माही परत केला.) पण मग पुलंची भेट झाली, (त्या वयात) स्वप्नवत वाटणारं 'दर्शन' घडलं ते पक्कं आठवतं.

पार्त्याच्या एका सभागृहात श्री. ना. पेंडसे लिखित 'राजेमास्तर' या नाटकाचा पुलंच्या हस्ते मुहूर्त होता. तिथे मला माझ्या बाबांचे मित्र घेऊन गेले. त्यांनी माझ्या संग्रहातली पुलंची पुस्तकं - तोपर्यंत प्रकाशित झालेली सगळीच्या सगळी पाहिली होतीच,

शिवाय पुलंविषयी वर्तमानपत्रात आलेला मजकूर, त्यांची भाषणं या सगळ्याची मी व्यवस्थित कापून वह्यांमध्ये चिकटवलेली कात्रणंही पाहिली होती! (त्यांना ते 'वेड' बघून हसूच फुटलं होतं!) 'पुलंना भेटायचंय तुला? माझे मित्र आहेत ते.' असं त्यांनी म्हटल्यावर मला जवळजवळ हर्षवायूच झाला होता. 'राजेमास्तर'च्या मुहूर्ताच्या वेळी 'दर्शन' झालं! पुलंना पाहिल्याबरोबर वाटलं, आपल्यासमोर जी प्रतिमा होती, तसेच तर हे एरवीही दिसतात की! आनंदी, मिश्किल परफॉर्मर ! त्यांच्या अभिनयाच्या आणि संगीताच्या कर्तृत्वापेक्षा, वक्तृत्वापेक्षा त्यांचं साहित्यच आठवत राहिलं. परिच्छेदच्या परिच्छेद, वाक्यंच्या वाक्यं... विनोद एकापाठोपाठ एक ! कुडाळकरकाकांनी ओळख करून दिली. आता मला तो प्रसंग आठवला की वाटतं, त्यावेळच्या माझ्यात पुलंच्याच 'सखाराम गटणे' या पात्राची लक्षणं दिसत होती की काय? अर्थात मी 'कृत्रिम' किंवा 'छापील' बोलत नव्हतो. काही बोलतच नव्हतो. कुडाळकरकाकाच पुलंना म्हणाले, 'बरं भाई, येतो आम्ही.' पुलंनीच माझा हात हातात घेऊन 'बरं भेटू या हं' म्हटलं.

त्यानंतर काही काळानं आम्ही बऱ्याचदा भेटलो. तालमीत प्रयोगांआधी नाटकांच्या नंतर - त्यांच्या घरी नाट्यगृहांमध्ये. त्या आठवणी आहेतच. पण पहिल्या 'दर्शना'ची आठवण खास आहे.

या मनातल्या प्रतिमेशी बरोबर जुळणाऱ्या व्यक्ती. पण असेही भेटले, जे कल्पनेतल्या रूपाला छेद देणारे होते. प्रत्यक्षातले अगदीच वेगळे. आश्चर्यच वाटावं, चकित व्हावं, अविश्वास वाटावा असे. त्याबद्दल पुढच्या वेळी.

- दिलीप प्रभावळकर
मूळ स्रोत - मुंबई टाइम्स 


Thursday, March 26, 2026

चांदण्यांची झाडं - (ना. धों. महानोर)

माघी पौर्णिमेची रात्र. अतिशय सुंदर, स्वच्छ चांदण्यांचं आकाश. निरभ्र आकाश. भक्कम असा चांदण्यांचा प्रकाश. हलका थंड गारवा. हवेत व मोसंबीच्या बागेतही. एक हजार झाडं-फळांनी लदबदलेली. सोळा सोळा फूट अंतरावर दहा वर्षांची, एका रांगेत उभी असलेली, छान उठून दिसणारी मोसंबीची बाग. गारवा झिनमिन अंगभर चिपकणारा. मोसंबीच्या फुलांचा घनदाट दरवळ. सगळा आसमंत सुगंधित करणारा. दहा, अकरा, बारा वाजता वाढत जाणारी रात्र. लहानशा गवताच्या झोपडीजवळ मोसंबीच्या बागेत उतरलेलं माघी पौर्णिमेचं स्वच्छ निरभ्र चांदणं. शांत एकान्त. मध्येच वाऱ्यावर वाहत येणाऱ्या बांधावरल्या मोहाच्या शुभ्र फुलांचा मादक सुवास. मोहाच्या फुलांच्या नुसत्या सुवासाने सगळे तरतरीत झालेले.

पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कविवर्य बा. भ. बोरकर, वा. ल., आणखी शेतावरले पाच-सहा गडी. पाच-सहा साहित्यिक मित्र. माघी पौर्णिमेच्या रात्री मोसंबीच्या बागेत सबंध मराठी कविता, गाणी गप्पा, मस्करी, हास्यविनोद अशी चढाओढ चाललेली. रात्रीचे दोन कधी वाजले हे कळलंसुद्धा नाही. मी भाईंना (पु.ल.) म्हणालो, "थोडे डोळे बारीक करून एकटक बागेकडे पहा." मोसंबीच्या झाडांच्या काळपट सावल्या मोसंबीच्या झाडांखाली घर करून स्वस्थ बसलेल्या होत्या. एक हजार झाडं. झाडांमधलं जे अंतर होतं त्यात चांदण्यांचं आभाळ उतरलेलं. त्याचं त्या त्या आकाराचं चांदण्याचं झाड झालेलं. असं प्रत्येक चार-चार झाडांमध्ये एक-एक चांदण्यांचं झाड संबंध बगीच्यामध्ये दिसू लागलं. वारा आला म्हणजे त्या झुळुकीने जे झाड, नव्हे ते चांदण्यांचं झाड (मोठ्ठा झाडाचा पांढराशुभ्र झाडासारखा त्याचा ठिपका म्हणजेच झाड) हलायचं. दूर दूर अशा चांदण्यांच्या झाडांचं वाऱ्याच्या झुळकीसरशी लयबद्ध हलणं, मंद नाचणं.

आम्ही सांगितल्यावर मग बोरकर, सुनीताबाई, सगळ्यांनीच ती अस्तित्वात नसलेली परंतु प्रत्यक्षात असलेली चांदण्यांची झाडं मंद वाऱ्यावर, आमच्या कवितांवर, गाण्याच्या तालावर नाचताना पाहिली. आणि कसला आनंद ! हे वेगळं जग पाहिल्यावर, निसर्गाचं विलोभनीय सुंदर देखणं रूप पाहिल्यावर सगळेच वेडे झाले. बागेत पुन्हा पुन्हा डोळे टाकून पाहू लागले. निसर्गाच्या सचेतन मानवी जगण्याचा अपरंपार आनंद. सगळ्यांनी मिळून समूहाने कवितेचं आनंदगान गाताना, कविता म्हणताना बोरकरांनी अंगावरली शाल फेकून दिली आणि उभं राहून त्या चांदण्यांच्या झाडांमध्ये एकरूप होऊन ते मनसोक्त नाचू लागले. खूप नाचले. झाडांसोबतच्या डोळ्यांवर. अशा खूप रात्री. ऋतुवंत निसर्गाचं रूप. कवितेत कधीच न लिहिता आलेली, चित्रं उभी न करता आलेली त्यांची रूपं आजही मला पछाडून टाकताहेत, आनंद देताहेत. ते नीट लिहिता येत नाही... शब्दांपलीकडलं खरं म्हणायचं तर हेच. निसर्गाचं विविध रूपांनी नटलेलं, खुणावणारं आकाश, डोळे खुडून नेणारं आकाश.

- ना. धों. महानोर

Tuesday, March 10, 2026

पुलंनी आपल्या मेव्हण्याना लिहिलेलं हे पत्र..

(डॉ. श्रद्धानंद ठाकूर या आपल्या मेव्हण्याना पुलंनी लिहिलेलं हे पत्र गंमत म्हणजे डॉ. ठाकूरांनाही भाई हे टोपण नाव होतं.)

प्रिय भाई,

तुझे अमेरिकेहून पाठवलेले पत्र माझ्या वाढदिवसाच्या तारखेलाच लिहिलेले असल्यामुळे त्या दिवशी भरतभूमीत पोहोचणे शक्य नव्हते, पण आश्चर्य म्हणजे त्याच तारखेला खुद्द पुण्यातून पाठवलेल्या पत्राआधी मिळाले. यंदा माझ्या वाढदिवसाचा सप्ताह साजरा होत असल्यासारखी पत्रे येत आहेत. जन्तेला मी सत्तरीत शिरल्याचा भलताच आनंद झालेला दिसतो. वास्तविक ह्या वयातल्या वाढदिवसात वार्ध्यक्यसुलभ व्याधीखेरीज आणखी इतर कसलीही वाढ होत नसते. हे काही चतुर मंडळींनी जाणून मला एक आयुर्वेदिक उपचार पद्धती एक होमेपदी आणि एक ऍलोपथी अशी तीन घराण्यांची तीन पुस्तके वाढदिवसाची भेट म्हणून आली आहेत. एवढ्याने झाले नाही म्हणून एक अॅक्युपंक्चर तज्ज्ञ मला टोचून जाण्याचा मनसुबा व्यक्त करून गेले ते निराळे!

आज १८ तारीख. पण आजच्या डाकेलाही शुभेच्छापत्रे आली आहेत. एकदम हा इतका वर्षाव होण्याचे कारण मुंबई दूरदर्शनने एका कार्यक्रमात माझ्या गुळाच्या गणपतीतला इंद्रायणी काठी प्रसंग दाखवला आणि सुधीर गाडगीळने आज पु.लं.चा वाढदिवस आहे म्हणून उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजरात मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मध्यरात्री फोन येणे वगैरे चालू होते. सालाबादप्रमाणे अनेक परिचित अपरिचित मंडळी घरी येऊन शुभेच्छा देऊन गेली. त्यातच दिवाळी! (शिवाय जेमिनी सर्कस ह्या चालीवर) शुभा नितिन वगैरे आले होते. मोहन, अंजली, महेश सुमित्राही येऊन गेले. एका चाहत्याचा (?) फोन रात्री १२ ।। ला १० तारखेला आला. त्याला ८ ता.ला वाढदिवस झाल्याचे सांगितल्यावर, 'मला वाटलं अजून चालूच आहे. हैं हैं हैं! असे कोडगे उत्तर मिळाले. माझा वाढदिवस मी नवरात्रासारखा साजरा करतो अशी त्याची कल्पना असावी. एका उत्साही पत्रकाराने मला असेच ७ ता.ला मध्यरात्री जागवून ७० व्या वर्षाचे नवे संकल्प काय असे विचारले. 'इथून पुढे रात्री निवांत झोप घ्यावी, असे म्हणतो.' हे सांगून मी त्याला फुटवला! असा तर असो हा वाढदिवस.

तुझे ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचे वाचून खूप समाधान वाटले. वाटू द्यायची नाही म्हटले तरी काळजी वाटत होतीच. काळजी वाटण्यापेक्षा काळजी घेणे अधिक चांगले हे तत्त्वज्ञान कळते! मात्र तू त्या देशात जाऊन ऑपरेशन करून घेतलेस ते चांगले केलेस. तिथे ऑपरेशननंतरची देखभाल विशेष चांगली होते. मात्र विश्रांती ईज म्हणजे मस्टच घ्यायला हवी. (साला भर्डाचा स्टूडंट हाय!)

मात्र हे पत्र तुला मिळेल त्यावेळी तू व निर्मल डॉ. हबीकडून दिनेशकडे आलेली असणार. २२ नोव्हेंबरला रमाकांत अमेरिकेला जायला निघत आहे. विभाकडून तो दिनेशला फोन करीलच. त्याच्याबरोबर सुनीताने तुमच्यासाठी महाराष्ट्र टाईम्स, मौज, हंसचे दिवाळी अंक पाठवले आहेत. म.टा. व मौज मधे सुनीताचे लेख आले आहेत. जाणकार वाचकांची ह्या चिंतनपर लेखाला उत्तम दाद मिळाली आहे. सुधीर सवूर, गीता ह्यांना आमचे आशीर्वाद सांगणे. अमेरिकेला हेमंत संपून आता शिशिरागम झाला असणार. पुण्यातही आता थोडीफार थंडी पडायला लागली आहे. रात्रीच्या वेळी उष्ण तापमान १०-११० सेल्सीयस पर्यंत जाते. दिनेशला ज्योती गरम कपडे चढवते ना?

-भाई
(जीवनज्योत दिवाळी अंक २००९)

Saturday, February 14, 2026

बोटीवरील एक जोडपे - पूर्वरंग

बोटीवरच्या एका जोडप्याने मला फार कौतुक वाटले. हे जोडपे मधुचंद्रासाठी निघालेले असावे. पारव्यासारखे हे जोडपे सदैव आपल्याआपल्यात असे. भोवतालच्या बोटीची त्यांनी अजिबात दखल घेतली नाही. बोटीवरच्या कुठल्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही. शिष्टाचार म्हणूनदेखील त्यांनी कुणाला 'हॅलो' केले नाही.

त्यांच्या साऱ्या प्रणयलीला अत्यंत सौम्य होत्या. गोरीपान, उंच, पेशावरकडली असावीत. त्यांच्या हालचालीत एक मजेदार नवखेपणा होता. एकमेकांना प्रसन्न करण्याची तत्परता होती. पहिल्याच दिवशी नास्त्याच्या वेळी मी त्यांना पाहिले चहादाणीतून याने चहा ओतला की ती दूध ओतायची, ह्याने साखर घातली की ती ढवळायची. तेव्हाच लक्षात आले की हळद अजून ओली आहे.
(चित्र - ए आय मार्फत बनविले आहे)
त्याचे लक्ष नसले तर ती त्याच्याकडे टक लावून पाहायची आणि दूर समुद्रात काहीतरी दाखवून तिचे लक्ष त्या दृश्याकडे वेधले की तो तिच्याकडे पाहत असे. मधुचंद्राचे हे तरंगते चालतेबोलते काव्य पाहणे हा एक विरंगुळा होता. त्यांच्या त्या अलिप्तपणात एक विलक्षण मोहकता होती. त्यांची ओळख करून घ्यावी असे वाटले; पण विचार आला की, स्वर्गात आहेत बिचारे, का त्यांना जमिनीवर ओढा ? त्यांचा प्रेमविवाह नसावा. कारण त्यांच्या जोडहालचालीत पूर्वपरिचयाचा सराईतपणा नव्हता. एखाद्या रमणीय, पण अगदी नवख्या प्रदेशात शिरणाऱ्या प्रवाशासारखी ती एकमेकांच्या मनात शिरत होती.

- पूर्वरंग 
पु . ल . देशपांडे 

Tuesday, January 13, 2026

कुमार गंधर्व एक असामान्य कलावंत

..चव्वेचाळीस - पंचेचाळीस सालची गोष्ट असेल. पुण्यातल्या भावे स्कूलच्या हॉलमध्ये कुमारचे गाणे झाले होते. त्या दिवशीची ' सुघर बर पायो ' अप्रतिम जमली होती. त्याच मैफिलीत कुमारने " प्रेम केले काय हा झाला गुन्हा" हे राजा बढ्यांचे भावगीत म्हंटले होते. मैफिलीला भानुमती श्रोत्यांत होती. " प्रेम केले काय हा झाला गुन्हा" ही ओळ म्हटल्यावर श्रोत्यांत एक " आम्ही वळखलं गss" च्या चालीची खसखसही पिकली होती. त्या विलक्षण जमलेल्या मैफिलीचे सूर कानात घेऊन परतणाऱ्या लोकांच्या स्वप्नातही नव्हते की, पुढली पाचसहा वर्षे हे गाणे मूक होणार आहे! पुण्याची ती कुमारच्या आजारापूर्वीची शेवटची बैठक. अनपेक्षितरीतीने बातमी आली की, कलकत्त्याच्या कॉन्फरंसमधून गाऊन येताना सर्दी - खोकला झाल्याचे निमित्त झाले, आणि तपासणीत ती व्याधी फार मोठी ठरली. त्यानंतरची पाचएक वर्ष कुमारने इंदूर देवासच्या भागात रुग्णशय्येवर काढली. सत्तेचाळीस ते बावन्न, पाच वर्षे कुमारचा सूर आमच्या कानी पडला नव्हता.

त्रेपन्न साल उजाडले. पुण्याला ' गुळाचा गणपती ' नावाच्या माझ्या चित्रपटाचे शूटिंग चालले होते. आऊटडोअर लोकेशन पाहायला मी देहू - आळंदीच्या दिशेला गेलो होतो. संध्याकाळी पाच - साडेपाचाच्या सुमाराला बादशाहीच्या बोळातल्या माझ्या बिऱ्हाडी परतताना नाक्यावर वामनराव देशपांडे मला भेटले.

" चला - असाल तसे चला"

मी माझ्या आळंदीच्या अबीर बुक्क्यात होतो. मी म्हटले, " कुठे चला?"

" अहो कुमार आलाय!"

" काय म्हणता काय? कुमार हिंडाफिरायला लागला?"

"अर्धा तास गायची परवानगी मिळालीय त्याला डॉक्टरची - गणूकाका कात्र्यांच्या क्लासात चला, फडक्यांच्या वाड्यात."

तसाच त्या दिशेने सुटलो. तीसचाळीस मंडळी होती. वसंत देशपांडे होता, अरविंद मंगरुळकर, वृद्ध मेहबुबखाँसाहेब होते, मारुलकरबुवा, मूछकाका पटवर्धन, भास्करबुवा जोशी. सुरुवातीला गणूकाकांनी कुमारला पुष्पहार वगैरे दिला. मग थोडावेळ वझेबुवांचे शिष्य भास्करबुवा जोशी गायले. मग वसंत देशपांडे गायला. मग हळूच कुणीतरी कुमारला सुचवले, " म्हणणार का काही?" त्याच्या चेहऱ्यावर एक मिस्किल हास्य उमटले. स्वारी दोन तंबोऱ्यात बसली. बसण्यातला तोच डौल. तंबोऱ्याचे गुंजन सुरू झाले. समोर उतू जाणारा आनंद चेहऱ्यावर दाटलेली स्नेहीमंडळी आणि गेली पाचसहा वर्षे आम्ही ज्या षडजासाठी आसुसलो होतो तो षडज लागला त्याच ताकदीचा. म्हातारे मेहबूबखाँ आजूबाजूचा शिष्ट समाज काय म्हणेल याची फिकीर न करता आपल्या खास मुशेलमानी मऱ्हाटीत उद्गारले,

" व्वा! अवो, चड्डीत मुतायच्या उमरीचं होतं, तेव्हापासून पयल्या 'सा ' ची हीच ताकद की वोss! जियो - आमचं उमर ऊन जाईS!"

कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. पाच वर्षांपूर्वीचाच, कानांना ' आता अवधारिजो जी ' असे जरासे बजावून सांगणारा तोच, तसाच षड्रज लागला आणि त्यापूर्वी कुणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चिजेचा अद्भुत मुखडा कानी पडला, " मारुजी भूलो ना म्हाने. " अस्ताई म्हटल्यावर पुन्हा चिजेच्या तोंडाकडे येताना मारूजी मधल्या ' जी ' वर कुमार कोमल रिषभावर दोनच सेकंद असेल पण अश्या ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, ' सोहनीभटीयार ' आणि म्हणाला, " गेल्या काही वर्षांत असे काही नवीन राग आणि चिजा झाल्या आहेत. "

शेवटी कुणाच्या तरी हाताला यशाची गुरूकिल्ली लागली आणि कुमार त्या आजारातून उठला. रामूभय्यांनी तर साऱ्या इंदूरला गावजेवण घालायचे बाकी ठेवले होते. गणूकाकांच्या क्लासात त्या संध्याकाळी कुमारचे गाणे ऐकून मी आणि वसंत देशपांडे माझ्या घरी परतल्यावर मध्यरात्र उलटेपर्यंत त्या अनुभवाचा आनंद आठवीत बसलो होतो. त्या दिवशी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीवरचा हार कुणीतरी मला प्रसाद म्हणून दिला होता. त्या हाराशी ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन आणि कुमारची ही मैफिल निगडित झाली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून तो हार कित्येक दिवस जपून ठेवला होता.

कुमारच्या स्वरांचे मयूरपंख फुलले की एक प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. या भाग्याचा धनी मी का झालो? हे धन मला देऊन गेलेल्या किती म्हणून कलावंतांचे स्मरण करावे! झोळी खूप भरलेली आहे.पण कुमारने भरभरून दिलेल्या सुवर्णक्षणांच्या मुठी मोजदादीपलीकडल्या आहेत.

- पु. ल. देशपांडे
गुण गाईन आवडी

Monday, December 29, 2025

सुनीताबाईंनी पुलंना लिहिलेलं एक खास पत्र..

भाईंना उतारवयात गुडघे दुखी कधी असह्य होत असे एकदा त्यांनी बाहेर गावी असताना थोड निराशेचा सूर असलेले एक पत्र लिहिले होते त्याला बाईंनी असं उत्तर दिलं होतं.

"हा तू काय सूर लावला आहेस? रडका, तुझ्या पिंडाला न शोभणारा. एवढेसे दुखणे ते काय, त्याच्यापुढे अशी शरणागती ?... या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात या प्रयोजनाला तरी काही अर्थ आहे का? गांधींच्या प्रयोजनाचे काय झाले? आणि ख्रिस्ताच्या? सुदैवाने नक्षत्रदर्शनाची हौस असलेल्या डॉक्टर मंडळींच्या संगतीत आहेस, तर त्यांच्या दुर्बिणीतून एकदा पाहा तरी. पृथ्वीसारखी जीवसृष्टी असलेले कोट्यवधी ग्रह त्या पसाऱ्यात असतील. काही ठिकाणची जीवसृष्टी तर इतकी प्रगत- की आपला आइनस्टाईन तिथे आदिमानव ठरावा. आणि एखाद्या धूमकेतूच्या शेपटाचा फटकारा सोड, पण नुसता वारा लागला तरी असे ग्रहही होते की नव्हते होऊन जातात. 
तिथे कसले प्रयोजन घेऊन बसलास ? आणि प्रयोजन नाही म्हणजे तरी काय? या पसाऱ्याची गंमत पाहत, सुख-दुःखापासून जरा अलग होत त्यांच्या पाठशिवणीचा खेळ पाहत. पुस्तकं-संगीत-निसर्ग वगैरेच्या संगतीत चिंतनशील आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करणे हेच प्रयोजन असू नये म्हणून कुणी सांगितलं? अगदी पायाचे दुखणंच म्हटले तरी वर्षानुवर्षे तक्रार न करत मी कसं सहन केलं असेल? मुळात काही नसलेल्या आणि जे चिमुटभर होत असेल तेही वाया गेलेल्या आयुष्याच्या अस्पष्ट होत चाललेल्या पसाऱ्यातून तृप्तीचे क्षण निवडत बसणे हेही जर प्रयोजन होऊ शकते, तर तुला काय कमी आहे?

गुढघा हा शरीराचा एवढासा भाग. त्याच्या एवढ्याशा दुखण्याने साऱ्या शरीराला आणि मनाला अशी मरगळ येऊ देणं म्हणजे त्या गुढघ्यांची एकतऱ्हेची हुकुमशाही मानणेच आहे. तेव्हा या गुढघ्यांचे कौतुक पुरे झालं. तू ठरल्याप्रमाणे ये, आपण परत तिकडे जाऊ, ट्रीटमेंटचं निमित्त, पण मुख्य म्हणजे काहीतरी ठरवलंय ते उघड्या माळाच्या नि आकाशाच्या आणि सुंदर सुंदर पुस्तकांच्या संगतीत शोधून काढू, 'इनफ ऑफ घिस, कॉमरेड, कम ऑन..."

(दिनेश ठाकूर यांच्या लेखामधून: आणखी पुलं लोकसत्ता विशेषांक)

Thursday, November 27, 2025

नाटक

एखाद्या बगीच्यात एकाच मातीतून नानातऱ्हेची रंगीबिरंगी फुले फुलावी तशी साहित्यातही जीवनाच्या अनुभवांतून येणारी नानातऱ्हेचीच फुले फुललेली असतात. त्यातील काही कथापुष्पे असतात, काही काव्यसमाने असतात, काही तत्त्वज्ञानाचे वटवृक्ष असतात. साहित्याच्या या बागेत नाटक नावाचा एक वृक्ष असाच फुललेला आहे.

इतर साहित्याप्रमाणे एखादा अनुभव सांगण्याची आणि तो ऐकणाऱ्याच्या मनाला आनंद देण्याची इच्छा हीच नाटक ह्या साहित्य प्रकारामागली प्रेरणा असते. पण इतर साहित्यप्रकार आणि नाटक यांच्यात एक मुख्य फरक असा आहे, की नाटक हे तो अनुभव जणू काय पाहणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे प्रत्यक्ष घडतो आहे, अशा रीतीने दाखवण्याच्या उद्देशाने जन्माला घातलेले असते.

नाटकाला प्रेक्षक येतो तो नुसता ‘ईक्षक’ म्हणजे पाहणारा नसतो. प्र अधिक ईक्षक असतो. म्हणजे विशेष चोखंदळपणाने पाहणारा असतो. संगीताला ‘श्रोता’ येतो. म्हणजे फक्त ऐकणारा. गवई डोळ्याला दिसला नाही तरी तो गायनाचा आनंद घेऊ शकतो. आणि कादंबरीतला वाचक असतो म्हणजे पुस्तक हाती घेऊन वाचणारा. वाचणारा किंवा वाचलेले फक्त ऐकणारा माणूस मनापुढे ती ती दृश्य आणतो.

नाटकाचा प्रेक्षक मात्र डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि कानांनी ऐकण्यासाठी येत असतो. त्यामुळे नाटककाराला ती दृश्ये डोळ्यांपुढे रंगमंचावर आणून खरी आहेत असा आभास निर्माण करायचा असतो. हा आभास आहे हे प्रेक्षकाला ठाऊक असूनही तो क्षणभर ते खरे आहे असे मानण्याच्या तयारीने आलेला असतो. रंगभूमीवरचा महालाचा देखावा हा पडद्यावर रंगवलेला आहे हे ठाऊक असूनही तो त्याला नाटकापुरता खरा महाल मानायला तयार होतो. शिवाजी महाराज होऊन आलेल्या नटाने खोटी दाढीमिशी लावली आहे हे ठाऊक असूनही तो त्या आभासाला घटकावर सत्य मानायच्या तयारीने आलेला असतो. परंतु जर नटाने तो आभास आपल्या अभिनय कलेने टिकवला नाही तर मात्र त्याचे लक्ष उडते. म्हणजेच नाटक रंगमंचावर अवयशस्वी होते. म्हणून नाटकाचे लेखन उत्तम असून चालत नाही. ते प्रेक्षकापुढे आणणारे नट, नेपथ्यकार, त्या प्रसंगाला उठाव देणाऱ्या प्रकाशाची संयोजना करणारे कलावंत किंवा प्रसंगात व्यक्त केलेल्या भावनांना आणि वातावरणाला अधिक परिणामकारक करणारे संगीत-नियोजक ह्या सर्वांना आपली कला पणाला लावूनच ते दरवेळी उभे करावे लागते.

नाटकात जी माणसे दाखवली जातात त्यांना आपण नाटकातली ‘पात्रे’ म्हणतो. भांड्याला देखील ‘पात्र’ असा शब्द आहे. ही नाटकातली पात्रे देखील एका अर्थी भांड्यासारखीच असतात. म्हणजे त्या पात्रामध्ये जो रस भरलेला असतो, तो त्या पात्राचे जसे दर्शन घडते त्याला साजेसा हवा. करवंटीतून कोणी आमरस भरून घ्यायला लागला तर ते चमत्कारिक वाटेल किंवा सुंदर सुवर्णपात्रातून रॉकेल भरलेले ही रुचणार नाही. म्हणजे ते पात्र आणि त्याचे वागणे, बोलणेसवरणे हे एकमेकांच्या आतल्या आणि बाहेरच्या स्वरूपाशी एकरूप झालेले असले पाहिजे.

नाटकाला इंग्रजीत ‘प्ले’ म्हणजे खेळ म्हणतात. आपणही पूर्वी “नाटकाचे खेळ झाले” असे म्हणत होतो. जुन्या मराठीत नटांना ‘खेळीये’ म्हटले आहे. हा माणसामाणसांतल्या निरनिराळ्या कारणांनी निर्माण होणाऱ्या तेढीचा, मैत्रीचा, शत्रुत्वाचा, आकांक्षांच्या पुर्तीचा किंवा अपूर्तीचा जय-पराजयाचा खेळच असतो.
नाटककार रंगमंचावर जो खेळ दाखवतो तो आपल्या मनातही सुरू होतो.

कलेतून मिळणारा आनंद आणि समाजाचे आरोग्य किंवा समाजाचे हित साधणारी कला असली तर दुधात साखर.
तंबोऱ्याच्या षड्जाच्या दोन तारा एकमेकींशी तंतोतंत जुळल्या म्हणजे त्यातून आपोआप गंधार हा स्वर उमटतो. नाटकातला किंवा एकूणच कलेतला समाज हिताचा विचार हा असा आपोआप उमटला पाहिजे.

****

‘एक शून्य मी’ ह्या पु. लं. देशपांडे यांच्या पुस्तकातील, ‘नाटक’ ह्या लेखातील काही उतारे. पु.ल. हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांना भले स्वतःची ओळख ‘आम्हाला हसवणारा माणूस’ म्हणून करून घ्यायला आवडले होते, अर्थात ते सार्थही आहे. तरी त्या विनोदबुद्धी मागे खूप मोठा व्यासंग, प्रखर बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि कलोपासकता होती हे नक्कीच. या पुस्तकात त्या बुद्धीची धार जाणवून देणारे अनेक लेख आहेत त्यातीलच हा एक ‘नाटक’. आज रंगभूमी दिन आहे. तर त्यानिमित्ताने पुलंसारख्या एका श्रेष्ठ ( आणि माझ्या आवडत्या) नाटककाराचे नाटकाविषयीचे विचार इथे समोर ठेवले आहेत.‌ अन्य नाटककार, कलाकार, नेपथ्यकार, किंवा नाटकाशी संबंधित अन्य कलावंत यांच्याकरता तर ते महत्त्वाचे आहेतच परंतु एक प्रेक्षक म्हणूनही मला ते समृद्ध करणारे वाटले. म्हणूनच हा प्रपंच!

पूर्ण लेख ‘एक शून्य मी’ हे पुस्तक घेऊन त्यात वाचावा.

- प्रेरणा कुलकर्णी

Tuesday, November 18, 2025

यक्षाचे तळे ... सुनीताबाई ! - (श्रीकांत अ. जोशी)

असं म्हणतात कि, "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते" आणि असंही म्हंटलं जातं कि, "स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते." या दोन्ही उक्ती सिध्द करणारं उत्तम उदाहरण म्हणजे सुनीता पुरुषोत्तम देशपांडे, अर्थात विदुषी सुनीताबाई ... महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंची सुविद्य पत्नी! खरं तर हीच त्यांची ओळख आहे का? कारण एखाद्या व्यक्तीचं नाव आणि आयुष्य जेव्हा असामान्य व्यक्तीशी जोडल्या जातं तेव्हा बहुतांश वेळा त्याची अवस्था ही बोन्साय केलेल्या झाडासारखी होते, एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत वाढ खुंटलेल्या रोपट्यासारखी होते. कारण तिनं स्वतंत्रपणे काही करायचं ठरवलं आणि केलं तरीही समाजाचं त्या गोष्टींकडं लक्ष जात नाही आणि समजा गेलं तरी त्या असामान्य व्यक्तीचा ठप्पा लावूनच समाज ती गोष्ट स्वीकारतो. त्यामुळं असामान्य व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीचा संघर्ष सहसा कोणाला कळत नाही, कारण इतरांच्या दृष्टीनं असं होणं म्हणजे भाग्याची गोष्ट असते. उदाहरणच द्यायचं झालं तर अभिषेक बच्चन चं देता येईल. 'वन मॅन इंडस्ट्री' असं संबोधल्या जाणाऱ्या अमिताभ चा मुलगा असल्यानंतरही बॉलीवूड मध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अभिषेक बच्चनला प्रचंड संघर्ष आणि मेहनत करावी लागली. थोडक्यात काय कि, असामान्य माणसाशी जेव्हा तुमची कोणत्याही प्रकारे नाळ जोडली जाते तेव्हा इतरांच्या दृष्टीनं जरी ती भाग्याची गोष्ट असली तरी त्या जोडल्या गेलेल्या व्यक्तीसाठी मात्र तो प्रवास काट्यावरचा असतो.

या न्यायानं विचार केला तर पुलंसारख्या अवलियाशी नातं जोडल्यानंतर 'विदुषी' म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करताना सुनीताबाईंचा प्रवास किती कठीण राहिला असेल. पण स्वतः पुलंनी सुनीताबाईंविषयीच्या भावना व्यक्त करताना जे सांगितलं त्यातून सुनीताबाईंचं पुलंच्या आयुष्यातील योगदान आणि त्यांची उंची याची जाणीव होते आणि सृजनतेचा आणि प्रतिभेचा संगम किती सुरेख असतो याची आपल्याला प्रचिती येते. सुनीताबाईंविषयी बोलताना पु.ल. म्हणाले होते, "मी रिकाम्या तासाला शिक्षकांच्या कॉमन रूममध्ये बसलो होतो, एवढ्यात खादीची पांढरी शुभ्र साडी, खादीचाच पांढरा शुभ्र ब्लाउज, अंगावर एकही अलंकार नाही, कपाळावर कुंकू नाही अशी सुमारे १६-१७ वर्षांची गोरीपान तरुणी ही झपाझप दार उघडून आत आली. तिचं नाव 'सुनीता ठाकूर'! तिच्याविषयी अलिप्ततेनं बोलणं मला शक्य नाही. पण एकच सांगतो कि, तिच्या रूपानं मला माझ्या आयुष्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही गोष्टींचं वरदान लाभलं. खरं म्हणजे ३६ वर्षांपेक्षाही जास्त अशा आमच्या वैवाहिक आयुष्याची कहाणी ही तिनंच सांगायला हवी. पुष्कळ वेळेला मला प्रश्न पडतो कि, माणसाच्या आयुष्यामध्ये प्रयत्नाचं स्थान किती आणि दैवाचं किती? कठीण आहे सांगणं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून १९४२ च्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या सुनीता ठाकूर नावाच्या एका बुध्दीवान आणि संपन्न घराणातल्या मुलीला गरिबीचा वसा घ्यावा, माझ्यासोबत संसार करावा असं का वाटलं असावं? फक्त ५५ रुपयांमध्ये ६-७ जणांच्या संसाराचा गाडा मी ओढत होतो. बरं , माझं काही नाव आहे, यश आहे असंही काही नव्हतं. अशा या माझ्यासारख्या माणसाविषयी तिला ओढ का असावी आणि गेली अनेक वर्षे माझ्या आयुष्यातली मार्गदर्शक, माझ्या साहित्य, नाट्य वगैरे क्षेत्रातील सहकारिणी, त्यानंतर माझी अकाउंटंट, मॅनेजर सगळं काही, एवढंच नव्हे तर स्त्री पुरुषासाठी संसारात ज्या ज्या म्हणून खस्ता खाते त्या खस्ता काढणारी म्हणून तिनं का म्हणून माझ्याबरोबर रहावं, तिला माझी ओढ वाटावी आणि आजही आमचा संसार टिकून आहे हे सगळं गूढच आहे. बाकी एक, आमच्या संसारामध्ये सुखदुःखाच्या प्रसंगी आम्हाला जोडून धरणारा एक धागा आहे महत्वाचा, तो म्हणजे कवितेचा! कविता म्हणजे कविता करायचा नव्हे, कविता वाचायचा, कविता म्हणायचा. कदाचित त्यामुळंच तिच्यासोबतचा माझा प्रवास एखाद्या कवितेइतकाच यमकाला यमक जुळवत काव्यमय झाला असावा."

पु.ल. अर्थात भाईंनी सुनीताबाईंविषयी बोललेला शब्द न शब्द हा सुनीताबाईंचा मोठेपणा दर्शवणारा आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा होता. मला ही अशी माणसं मुरलेल्या लोणच्यासारखी वाटतात. ती जितकी जुनी होत जातात तितकी चविष्ट होत जातात. सुनीताबाई जितक्या शिस्तीबाबत काटेकोर तितक्या भाईंच्या विषयी हळव्या होत्या. पुलंच्या लेखनासाठी सुनीताबाईंनी काय काय केलं याविषयी प्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले सांगतात, "पुलंच्या लेखनासाठी सुनीताबाईंनी काय केलं नाही? त्यांना लिहिण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांच्यावर कोणतंही दैनंदिन काम पडू दिलं नाही. लिहिण्यासाठी लागणारी शांतता - निरामयता त्यांना मिळावी म्हणून दक्षता घेतली. नुसती दक्षताच नव्हे, तर जनापवादही घेतले. “भाई, तू आता नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या लेखनात बुडला आहेस. आता हे भाषणाचं निमंत्रण घेऊ नकोस.” असं भाषण ठरवायला आलेल्यांसमोर बजावणं असो, किंवा “तुम्ही आलात खरं, पण आता भाई तुम्हांला भेटणार नाही. तो महत्त्वाचं लिहितोय. ते झाल्यावर मी तुम्हांला बोलावेन.” असं एखाद्या अनाहूत पण सन्माननीय पाहुण्याला सांगणं असो. कोणामुळेही पुलंची लेखनाची तंद्री मोडणार नाही याबद्दल त्या सदैव सावध राहिल्या. पु.ल. लिहीत बसले असताना त्यांच्या खोलीत चहा, दाण्याची वाटी, सिगरेटची पाकिटं अशी 'कुमक' न सांगता पुरवली. पुलंनी तो खर्डा पूर्ण करून, वाचून दाखवल्यावर परखड मत दिलं. केवळ स्तुतिपाठकाची भूमिका कटाक्षानं टाळली."(सुनीताबाई - मंगला गोडबोले) यावरून पु. ल. मधील लेखक घडताना त्यात सुनीताबाईंचं योगदान किती अनमोल होतं हे लक्षात येतं.

लेखन, अभिनय, संगीत, अभिवाचन या पु.ल. यांच्या प्रवासात सुनीताबाई त्यांच्या मागे सावलीसारख्या उभ्या होत्या. तेव्हा त्या फारशा प्रकाशझोतात नव्हत्या. परंतु या जोडीनं बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा.सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्याचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरु केले तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य रसिकाला सुनीताबाईंची ओळख झाली. कविता हा या जोडीचा जीव कि प्राण होता. १९९० साली 'आहे मनोहर तरी' हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे सुनीताबाईंचे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्यानं साहित्य क्षेत्रात आणि पुलंच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळच उडवून दिली. त्यानंतर 'मनातलं आभाळ', 'अवकाश' आणि 'सोयरे सकळ' ही पुस्तकं लिहून त्यांनी लेखिका म्हणून साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'प्रिय जी.ए.' हे त्यांचं प्रकाशित झालेलं शेवटचं पुस्तक. जी.ए. कुलकर्णी हे सुनीताबाईंचे अत्यंत आवडते लेखक. त्या त्यांच्याशी वेळोवेळी पत्राद्वारे संवाद साधत. या पत्रांचा संग्रह म्हणजे 'प्रिय जी.ए.'! या पुस्तकानं साहित्य क्षेत्रात एक वेगळं दालन उघडून दिलं.
३ जुलै १९२६ रोजी रत्नागिरीला जन्मलेल्या सुनीताबाईंना त्यांचं व्यक्तिमत्व समृध्द करणारी कौटुंबिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी मिळाली. आपल्या 'सोयरे सकळ' या पुस्तकात त्यांनी ज्या तलावाचा 'यक्षाचे तळे' असा उल्लेख केला ते धामापूर येथील तलावाचे वर्णन आहे. अशा निसर्गसौंदर्याचं मुक्त हस्तानं उधळण असणाऱ्या वातावरणात सुनीताबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यामुळंच त्यांच्याजवळ एक सौंदर्यदृष्टी होती. भाईंना भेट म्हणून आलेल्या पुष्पगुच्छातील फुलांची त्या इतक्या सुंदर रीतीनं मांडणी करायच्या कि, पाहणारा पाहतच राहील! कवितेची ओढही कदाचित यातूनच निर्माण झालेली असावी. त्यांचे मामा राजा पाटेकर यांनी अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे यांच्याशी सुनीताबाईंचा परिचय करून दिला आणि सुनीताबाई सेवादलात सक्रिय झाल्या.

१९४२ च्या चळवळीत अण्णासाहेबांनी भूमिगत रेडिओची जबाबदारी सुनीताबाईंवर सोपवली, परंतु ते काम पूर्णत्वास गेले नाही. त्यानंतर त्यांच्यावर टाईम बॉम्ब तयार करण्याचे काम सोपवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोर्चाचे नेतृत्व करत मिल्ट्रीच्या ताफ्याचा मोठ्या हिमतीनं सामना केला. बंगाली आणि उर्दू भाषांचा त्यांचा अभ्यास देखील चांगला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मुंबईला आल्या. जुवळे नावाचे एक शिक्षणप्रेमी दादर भागात 'ओरिएंट हायस्कुल' चालवत होते. त्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. पुलंशी त्यांची प्रथम भेट झाली ती इथेच! पुलंसारख्या कलंदर वृत्तीच्या अवलियाला त्यांनी आईच्या मायेनं सांभाळलं. त्यांच्या सृजनशीलतेला कायम प्रोत्साहन दिलं. प्रसंगी कडव्या शिस्तीच्या आणि प्रसंगी संवेदनशील मनाच्या सुनीताबाईंमध्ये एक समाजसेविका दडलेली होती. त्याला त्यांनी आपल्या दातृत्वाची जोड दिली. 'पु. ल. देशपांडे फाउंडेशन' ची स्थापना करून त्यांनी या फाउंडेशन द्वारे अनेक संस्थांना लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. शिवाय त्याची कुठेही प्रसिध्दी होणार नाही याची काळजी घेतली. 'साधी राहणी उच्च विचार' या सुविचाराचा त्या मूर्तिमंत प्रतीक होत्या.

ज्या पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं त्या पुलंच्या ओठांवर कायम हास्य राहील, त्यांच्या लेखणीतून कायम आनंदाचा झरा वाहत राहील ही काळजी देवालाही असावी. म्हणून तर त्यांनी पुलंच्या आयुष्यात सुनीताबाईंना आणलं, जी एकाच वेळी त्यांची पत्नी होती, आई होती, मैत्रीण होती, सहचारिणी होती, समीक्षक होती आणि त्यांची प्रेरणा देखील. या एवढ्या भूमिका केवळ सुनीताबाईंसारखी स्त्रीच निभावू शकते. म्हणूनच लेखाचा समारोप करताना म्हणेल कि, जसं 'पु. ल. पुन्हा होणे नाही' तसंच 'सुनीताबाई देखील पुन्हा होणे नाही!'

श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

Wednesday, October 15, 2025

तुझे आहे तुजपाशी - मराठी रंगभूमीच्या व्यावसायिक युगाचा आरंभ (रजनीश जोशी)

या नाटकाची जन्मकथाही मोठी रंजक आहे. मालेगावला एका प्रकल्पावर काम करण्यासाठी पुलं आणि सुनीताबाई गेले होते. तेथे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करता आले नाही, पण तथाकथित गांधीवादी नेत्यांनी स्वतःच्या सवयी, त्याग आणि भोगाचे जे नमुने दाखवले ते त्यांच्या मनावर ठसले होते. पुलंनी 'तुझे आहे तुजपाशी'चे अडीच अंक लिहून ठेवले होते, ते पूर्ण झाले नसल्याने त्यांनी अनेक दिवस तसेच ठेवून दिले. ३ जुलै १९५६ रोजी सुनीताबाईंचा ३१ वा वाढदिवस होता. पुलंनी त्यांना वाढदिवसाची कोणती भेट देऊ, असे विचारले तेव्हा 'हे नाटक पूर्ण करून दे' असे सांगितले. आणि पुलंनी ते पूर्ण केले. या नाटकाने लोकप्रियतेचे मानदंड निर्माण केले. वि. वा. शिरवाडकर यांनी 'तुझे आहे तुजपाशी' पासून मराठी रंगभूमीच्या अव्यावसायिक युगाची समाप्ती आणि व्यावसायिक युगाचा आरंभ झाला,' असे उद्गार काढले होते.

पुलंनी या नाटकाबद्दल एका मुलाखतीत सांगितले - होते : 'आता इतकी वर्षं झाली त्या गोष्टीला, की मला तो तपशील आठवतसुद्धा नाही. पण एक विचार माझ्या डोक्यात अनेक वर्षं होता. ज्याप्रमाणं त्यागानं किंवा ध्येयवादानं जगणं हे मूल्य मानलं जातं, त्याप्रमाणं सौंदर्य हे एक मूल्य आहे. पण - आपल्याकडे मात्र अनेकवेळा सौंदर्याचा संबंध चैनीशी जोडला गेला, आनंददायक गोष्टी उगीचच त्याज्य मानल्या गेल्या आणि आनंद त्याज्य मानणारे लोक म्हणजेच सारे सात्विक, ध्येयवादी वगैरे अशी चुकीची - समजूत पुष्कळवेळा झाली. एक त्यागी जीवन आणि एक आनंद देणारं - भोगणारं जीवन म्हणजे गांधीजींसारखा त्यागी महात्मा आणि दुसरा - टागोरांसारखा सौंदर्याला जीवनमूल्य मानणारा आणि तरीही विरागी; अशा दोन वृत्तींचं द्वंद्व नाटकातून परिणामकारकपणे उभं करता येईल, असं मला वाटलं. काही लोकांना अशा तऱ्हेचं द्वंद्व आता - कदाचित ढोबळ वाटेल, तर मी ते मान्य करीन. पण ज्या काळात, ज्या वयात मी ते नाटक लिहिलं, तेव्हा अशा त-हेची दोन वृत्तींमधली द्वंद्वं दाखवली जायची. त्या काळाचा किंवा संस्काराचा हा परिणाम - असेल. त्यामुळे आजच्या हिशेबात 'तुझे आहे - तुजपाशी' हे नवीन नाटक आहे, असं मी म्हणणार नाही. त्यातील शामची भूमिका ही लेखकाची भूमिका आहे. नाटकाचा गाभा विनोदी ठेवल्यानं कोणावर - दुष्टपणानं आरोप ठेवले गेले नाहीत. त्यातल्या आचार्यांची मला चेष्टा करायची नव्हती. त्यांना शेवटी - सहानुभूती दिली, तीसुद्धा जाणीवपूर्वकच.'

जगण्यासाठी त्यातील काकाजींचे तत्त्वज्ञान आजही वेगवेगळे वक्ते आपल्या व्याख्यानातून सांगत असतात. पुलंच्या स्वभावविशेषाचे दर्शन दाखवणारी त्यातील काकाजींची भूमिका आहे. जीवन सुंदर आहे, ते आनंदात जगलं पाहिजे, ही भूमिका घेऊन वावरणारे काकाजी सुखाच्या शिखरावर आहेत. 'लुतफे मैं तुझसे क्या कहूँ जाहिद, हाय कंबख्त ! तू ने पी ही नही!' हे उद्गार मद्याला उद्देशून असले तरी जीवनाशी संबंधित आहेत. आयुष्यातील सुख-दुःखाच्या क्षणाचा उपभोग घेतल्याशिवाय ते कळत नसतं. आध्यात्मिक ग्रंथांच्या नुसत्या पारायणानं आत्मिक आनंद गवसत नसतो. 'आयुष्यभर सकाळी साध्या वरणाबरोबर फोडणीचा भात आणि रात्री फोडणीच्या वरणाबरोबर साधा भात खाऊन कवडी कवडी जोडायची आणि शेवटी 'श्रमसाफल्य' किंवा असंच काही तरी नाव देऊन डेक्कन जिमखान्यावर बंगला नावाची भाड्याची चाळ बांधायची - झाली आयुष्याची इतिकर्तव्यता' हे काकाजींचे उद्गार चाकोरीबद्ध जगणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत.

या नाटकातून पुलंनी प्रेक्षकानुनय केला आहे. आचार्यांचे मनःपरिवर्तन ज्या गतीने होते ते न पटणारे आहे वगैरे त्रुटी समीक्षकांनी काढल्या. सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यात काही खटकले नाही. पुलंनी एकेठिकाणी म्हटलंय, 'पहिला प्रयोग हाऊसफुल्ल तर होता. सतत दीडशे प्रयोग एकही खुर्ची खाली नव्हती. पंचविसाव्या प्रयोगाबद्दल सत्कारासाठी काही मंडळी आली, तेव्हा त्यांना सहज गमतीनं मी म्हटलं, 'माझ्या साठाव्या वर्षी जर हे नाटक चालू असेल, तर मी स्वतः सत्कार करून घेईन.' आणि विशेष म्हणजे मला साठावं लागलं, त्या दिवशी या नाटकाचे पाच वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग होते. अजूनही खूप चाललंय. मलासुद्धा आश्चर्य वाटतं. कुणीतरी म्हणालं, हा फ्ल्यूक आहे. माझ्या आयुष्यात असे फ्ल्युक्स वारंवार आले!'

'तुझे आहे तुजपाशी'च्या लेखनाची काटेकोर चिकित्सा करून त्यातील उणिवांवर बोट ठेवता येण्यासारखे आहे. तशी सापेक्ष मते असतातच. पुलंचं हे नाटक त्या सगळ्याला तोंड देऊन रसिकमनांवर कायम राज्य करीत राहिलं, एवढं निश्चित.


- रजनीश जोशी
रंजनमूल्य असलेली पुलंची नाटके
असा असामी - पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी गौरवग्रंथ

Wednesday, September 3, 2025

भाई माझ्या सोयगावला आले तेव्हा.. (ना.धों. महानोर)

जून, २०००. मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाला होता. माझी पेरणी, झाडं लावणं चाललेलं होतं. १२ जूनला पु. ल. देशपांडे गेल्याची बातमी कळली. मी पेरणीची कामं थांबवली आणि त्या रात्रीच पुण्याला निघालो. दुसऱ्या दिवशी पुण्यात भाईंचं अंत्यदर्शन घेतलं. तिथे दिवसभर माणसांची प्रचंड गर्दी होती, पण सारं कसं शांत, नि:शब्द!

त्यानंतर तीन महिन्यांनी मी आणि माझी पत्नी पुन्हा सुनीताबाईंना भेटायला गेलो. आम्ही तिघांनीच दीड तास फक्त भाईंच्या, त्यांच्या मित्रांच्या आठवणी जागवल्या. सुनीताबाई भावविवश न होता कमालीच्या शांतपणे एकेक आठवण सांगत होत्या. “ऐंशी वर्षांचं आयुष्य भाईला मिळालं. त्याने त्याला आवडतील त्या त्या गोष्टी मनापासून केल्या. त्याच्याकडून इतकं काम कसं झालं याचं आज नवल वाटतं. त्याला सहज सुचत असे, आणि तो लिहीत जाई. रसिकांनी त्याच्या सगळ्याच कलाकृतींना मनापासून दाद दिली. त्यामुळे तो खूपच आनंदाने भरभरून जगला. त्याचा विनोद कोणाला बोचणारा नव्हता, उलट प्रसन्न करणारा होता. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, अशा हेतूने तो लहान मुलासारखं सगळं धुंडाळत गेला. भाषणाला उभा राहिला म्हणजे त्याला आपोआप सुचत असे. लोकांशी सहज गप्पा माराव्या असं त्याचं भाषण असायचं. लोकांच्या मनातलं तो बोलायचा. भाईच्या मनात कुणाविषयीही कटुता नव्हती. त्याच्या सगळ्याच गोष्टींमध्ये मी त्याला साथ दिली. आपल्याकडचं सगळं वाटून देऊन तो गेला. शेवटी शेवटी त्याला असह्य त्रास व्हायचा. हयात नसलेल्या जिव्हाळ्याच्या मित्रांच्या आठवणी काढून तो उदास व्हायचा. पण तो खूप तृप्त मनाने, आनंदाने लोकांमध्ये राहिला. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? हजारो लोकांशी पत्रव्यवहार असायचा त्याचा. मी तेच आता जुळवत बसले आहे. त्याच्यावर लोकांचं प्रेम होतंच, पण इतकं असेल असं वाटलं नव्हतं. या तीन महिन्यांत ते मी पाहते आहे. अजूनही भाई घरभर असतो...” सुनीताबाई सांगत होत्या.

माझ्या पत्नीचे अश्रू थांबत नव्हते. मी माझ्या आणि भाईंच्या एकमेकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दल विचार करत राहिलो. मला प्रश्न पडला होता : आम्ही कोण-कुठले, इतके कसे एकमेकांशी बांधले गेलो? आमच्या अशा नात्याविषयी ज्यांना माहीत होतं त्यांनी मी त्याबद्दलच्या थोड्या तरी आठवणी लिहून काढाव्यात असा तगादा लावला होता. ‘अनेक आठवणी आहेत, तरीही मला लिहायला अवघड वाटतं,' असं मी म्हणायचो. पण सुनीताबाईही म्हणाल्या, “लिहिता आलं तर लिहा, वेगळं होईल.” त्यांच्या घरून निघताना मी ठरवलं, थोडं का होईना, लिहून काढू. औरंगाबादला परत गेल्यानंतर माझा मित्र चंद्रकांत पाटील याच्याशी बोलत होतो. आम्ही सुनीताबाईंना भेटून आल्याचं त्याला माहीत होतं. त्याबद्दल मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला, “नामदेव, पुलंच्या सहवासातल्या आठवणी लिही. तुझा नेहमीचा आळशीपणा सोडलास तर एका आठवड्यात ते लिहून पूर्ण होऊ शकेल.”

मग मी लिहिण्याचं मनावर घेतलंच.

पु. ल. देशपांडे यांचं नाव साहित्य, कला, नाटक, चित्रपट, गीत, संगीत अशा अनेक क्षेत्रांत सर्वदूर थेट पोहोचलेलं होतं अशा काळात मी एका खेड्यातल्या माध्यमिक शाळेत शिकत होतो. आमचे शिक्षक साहित्यप्रेमी असल्याने आम्हाला अवांतर वाचनासाठी पुस्तकं वाचायला मिळत. त्यातच कधी तरी पु. ल. देशपांडे यांची अगदी नवीन पुस्तकंही झपाटून वाचली. ‘गुळाचा गणपती', ‘देवबाप्पा' यांसारख्या चित्रपटांतली गाणी तोंडपाठ झाली होती. त्यांनी संगीतबद्ध केलेली आणखीही किती तरी गाणी ऐकलेली होती. शाळेतल्या उत्सवात ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात' हे गाणं हमखास सामूहिकच म्हटलं जात असे. पुस्तकातील त्यांचे धडे शिकवताना शिक्षकांची व शिकताना आमची हसून हसून मुरकुंडी वळायची. असा छान काळ होता तो. त्या काळात पु. ल. देशपांडे यांचं नाव मनावर घट्ट कोरलं गेलं.

मात्र पु. ल. देशपांडेंशी आपली भेट होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. ती भेट घडली माझ्या कवितेमुळे. मला कवितांचा छंद कसा जडला हे सांगणं आजही कठीणच आहे; परंतु काहीच आगापीछा नसताना कवितेने मला वेढून टाकलं होतं हे खरंच. १९६०च्या दशकात वेगवेगळ्या नियतकालिकांमधून माझ्या कविता छापून यायला लागल्या होत्या. (बऱ्याचदा त्या ‘साभार परत' देखील यायच्या.) १९६४ सालच्या ‘मौज' दिवाळी अंकात ‘चार कविता रानातल्या' या शीर्षकाने माझ्या कविता प्रकाशित झाल्या. लगोलग दिवाळीतच मला एक पत्र आलं : ‘मौज' दिवाळीतल्या ‘चार कविता रानातल्या' वाचल्या, माझी दिवाळीच नाही, तर वर्ष साजरं झालं; कधी, कुठे भेटणार; काय करता; इत्यादी बरंच काही त्या पत्रात होतं. पत्र पार्ल्याहून आलेलं होतं आणि खाली नाव होतं- पु. ल. देशपांडे. केवळ कवितेमुळे हा पत्रव्यवहार झाला आणि ध्यानीमनी नसताना माझा भाईंशी परिचय झाला.

१९६५च्या डिसेंबर महिन्यात हैदराबादला अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं. प्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी संमेलनाचे अध्यक्ष होते. मी आणि चंद्रकांत पाटील, आम्ही दोघांनी मिळून केवळ कवितेच्या निस्सीम प्रेमापोटी ‘पुन्हा कविता' या कवितासंग्रहाचं संपादन केलं होतं. प्रकाशक म्हणून आमचे मित्र रायभान यांचं नाव टाकलेलं होतं. पुस्तक वा. ल. कुलकर्णी यांना अर्पण केलेलं होतं. या कवितासंग्रहाची एक एक प्रत संमेलनाच्या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना भेट द्यावी असं आमच्या मनात होतं. संमेलनाच्या उद्घाटनासाठी कामराज, यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी इत्यादी मोठी मंडळी आलेली होती. उद्घाटनाचा मुख्य समारंभ आटोपल्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा भर्रकन निघाला आणि गर्दी पांगली. चंद्रकांत व मी मिळून नरहर कुरुंदकरांना भेटलो. आमच्याजवळ ‘पुन्हा कविता'चा मोठा गठ्ठा होता. कुरुंदकर म्हणाले, “आधी त्यांना द्या.” त्यांनी ज्या दिशेला बोट दाखवलं तिथे एक लांबसडक मोठी मोटारगाडी उभी होती; मोटारीजवळ पाच-दहाजण बोलत उभे होते. ती मोटारगाडी पु. ल. देशपांडेंची होती. कुरुंदकरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पु. ल. देशपांडे यांना पुस्तक दिलं. त्यांच्याशी प्रथमच प्रत्यक्ष भेट झाली होती. चंद्रकांत, मी, आमचे आणखी दोन मित्र रवींद्र सुर्वे, बाळ कवठेकर असे जरा संकोचूनच उभे होतो. पु.ल.नी आनंदाने माझ्या खांद्यावर हात टाकला. त्यांनी अगदी अगत्याने ‘पुन्हा कविता' चाळलं आणि म्हणाले, “पाडगावकर, करंदीकर, बापट यांच्यानंतरच्या अतिशय ग्रेट कविता लिहिणाऱ्या कवींचे कवितासंग्रह यावेत असं मला खूप दिवसांपासून वाटत आहे. ‘साहित्य', ‘छंद', ‘अभिरुची', ‘सत्यकथा', ‘प्रतिष्ठान' यांमधून एकेक कवी काय छान लिहितो आहे! तुम्ही हे प्रातिनिधिक का होईना, ओळख करून देणारं पुस्तक केलं, म्हणून मनापासून धन्यवाद! आरती प्रभू, चित्रे, पुरुषोत्तम पाटील, भालचंद्र नेमाडे, म. म. देशपांडे, मधुकर केचे, नारायण सुर्वे, तुळशीराम काजे, ग्रेस, अरुण कोलटकर, आनंद यादव, वि. ज. बोरकर, आ. ना. पेडणेकर असे पस्तीस तरणेबांड कवी म्हणजे काय बहार आहे!” गेल्या वर्षी कोणकोणत्या दिवाळी अंकांत या नव्या कवींच्या मराठी कविता वाचल्या हे देखील त्यांनी सांगितलं. ते ऐकल्यावर आम्ही चाटच पडलो. पु.ल. कवितेचे इतके चाहते असतील याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. त्यांनी आमच्या कवितासंग्रहाच्या आणखी दोन प्रती आवर्जून मागून घेतल्या; ‘लिहीत रहा' म्हणाले. तिथे आचार्य प्रल्हाद केशव अत्रेही होते. त्यांनी ‘पुन्हा कविता'ची प्रत चाळली आणि ते म्हणाले : “अरे बाप रे! इथे पुन्हा कवी, इतके कवी... कठीण आहे.” जयवंत दळवी व ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनाही आम्ही एक एक प्रत दिली. (दोघांनी ‘ललित'मध्ये व एका इंग्रजी नियतकालिकात त्यावर जोरदार लिहिलं.)

१९६७ साली ‘रानातल्या कविता' हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. महाराष्ट्रभर त्याचं उत्तम स्वागत झालं. शासनाचे व इतर अनेक पुरस्कार त्याला लाभले. त्या कवितांशी मराठी रसिकांचं निस्सीम प्रेमाचं नातं जुळलं. भाई कुठल्याकुठल्या भाषणांमध्ये त्या कवितांचा उल्लेख करत असत. भाईंचा आणि माझा पत्रव्यवहार वाढत होता. सुनीताबाईही अनेकदा पत्रं लिहीत. माझ्या कवितेबरोबरच माझं खेडं, कुटुंब, जगणं, शेतीवाडी, सगळं काही दोघांनी आपलं मानलं होतं. त्यांचं पत्र यायचं-‘पळसखेडला यायचं मनात आहे.' त्यावेळी पळसखेड म्हणजे जेमतेम दोनशे उंबऱ्याचं, हजार लोकवस्तीचं लहानसं खेडं होतं. तिथे या दोघांना कसं काय बोलावणार, असा मला प्रश्न पडायचा. गावात साहित्यपूरक वातावरण तर दूर, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणंही अवघड होतं. मी माझ्या शेतातल्या लहानशा झोपडीत राहायचो. घरात किंवा गावात दैनंदिन मूलभूत सोयीही नव्हत्या. त्यामुळे अनेक दिवस मी हा विषय टाळतच होतो.

मात्र १९७४च्या आसपास एकदा भाईंचं पत्र आलं- ‘बाबा आमट्यांच्या आनंदवनाला भेट देऊन परत येताना आम्ही जळगावी उतरून तुमच्या घरी तुमच्या शेतावर दोन-तीन दिवस थांबणार आहोत. यात बदल नाही. सोबत कविवर्य बोरकर, त्यांची मुलगी, तुमचे-आमचे शेतकरी मित्र बापू कांचन व गोविंदराव तळवलकर, मधू गानू, सुनीता असे सर्वजण आहोत. मजा येईल.'

पत्र वाचून मला खूप आनंद झाला. पण गावात या सर्वांचा पाहुणचार कसा करायचा या विचाराने घामही फुटला. जळगावहून माझे मित्र डॉ. राम आणि डॉ. उषाताई आपटे सर्वांना घेऊन पळसखेडला आले. एकूण तीन-चार मोटारगाड्या होत्या. पण गावात आल्यावर एकाच गाडीभोवती मुलांची, लोकांची गर्दी झाली. भाई प्रसन्नपणाने हसत बाहेर आले. मी म्हणालो, “भाई, यांना पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल अजिबातच माहिती नाही. सुनीताबाई गाडी चालवत आल्या हे त्यांना फारच नवलाईचं वाटतंय, इतकं हे खेडं आहे.” ते ऐकून सुनीताबाई छान हसल्या. भाईंनी आम्हाला चक्क टाळी वगैरे दिली. त्यांच्या मनमोकळ्या वागण्याने आम्हालाही जरा हलकं वाटलं. माझ्या घराच्या ओट्यावर लाल पागोटं व रुमाल बांधलेले, धोतर नेसलेले माझे वडील उभे होते. कपाळावर लालजर्द कुंकू लावलेली आईही होती. सोबत माझी पत्नी, भाऊ, सगळं घरच स्वागताला उभं होतं. भाईंनी बाबांना, आईला नमस्कार केला. माझ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. भाईंचे डोळेही आनंदाने भरून आले होते.

घरात ऐसपैस मनमोकळं बसल्यावर भाईंची मैफल सुरू व्हायला वेळ लागला नाही. त्यांनी त्यांच्या बरोबरच्या सगळ्यांची ओळख करून दिली. कोकणात म्हणजे बोरकरांच्या प्रदेशात खेडंही रम्य व सुंदर असतं. आता सगळे माझ्या दुष्काळी, उद्ध्वस्त चेहऱ्याच्या लहानग्या खेड्यात आले होते. बापू कांचन यांनी त्यांच्या द्राक्षांच्या बागेतली चविष्ट द्राक्षं भेट दिली. माझे वडील लिहिता-वाचता न येणारे; बापू थोडीफार शाळा शिकलेले. पण शेती या आवडत्या विषयामुळे दोघांची बघता बघता गट्टी जमली. दोघं शेतीच्या, इकडच्या तिकडच्या पिकांच्या, विहीरपाण्याच्या, शेतीच्या परिवर्तनाच्या गप्पा मारत होते. भाई म्हणाले, “अहो, आम्हाला यातलं काहीच कळत नसलं तरी मोठ्यांदा बोला. काही शिकता आलं नाही, तरी तुमचं बोलणं समजेल तरी. सगळ्या क्षेत्रातलं चांगलं ते समजून घेतलंच पाहिजे.” आणि मग बापू, माझे वडील आणि अधूनमधून मी अशा आमच्या तिघांच्या शेतीवरच्या गप्पा भाई व इतर तासभर मनसोक्त ऐकत बसले. गोविंदरावांनाही खूप काही नवीन ऐकायला मिळालं. किती तरी विषय... कविता, गाणं, शेती, खेडी... बाबा आमट्यांच्या आनंदवनाबद्दलच्या चर्चाही होत्याच. त्या महामानवाबद्दल भाई भरभरून बोलत होते. सगळे अस्वस्थ होऊन ऐकत होते. मध्येच सुनीताबाई एखादी पूरक आठवण सांगायच्या. जेवणाची वेळ टळून गेली तरी ही गप्पांची मैफल सुरूच होती.

जेवणानंतर सर्वांनी मिळून गावात फेरफटका मारला. गावातली बहुतांश घरं मोडकळीस आलेली; लोकांच्या पेहरावावरून, चेहऱ्यावरून कळून येणारं दारिद्य्र; गावात केवळ चौथीपर्यंतची शाळा; बहुतेक गावकरी अशिक्षित; हे सगळं पाहून भाई अस्वस्थ झाले. त्यांना प्रश्न पडला- अशा ठिकाणी हा कवी? याच्या कवितेत दिसलेला सुंदर व रम्य निसर्ग, शेती, पक्षी... कशाचाच गावात पत्ता नाही. सगळंच विपरीत, ओकं ओकं.

संध्याकाळी पाच वाजता आम्ही माझ्या बरड टेकडीवरच्या शेतावर पोहोचलो. लदबदल्या झऱ्यातून आम्ही पुढे गेलो. विहिरीचं पाणी दंडाने झुळझुळ वाहत होतं. केळीच्या प्रत्यक्ष वाफ्यात साचलेलं पाणी शुभ्र लहान तळ्यासारखं दिसत होतं. त्यात कमलिनी केळीचं सुंदर प्रतिबिंब पडलेलं होतं. भाई, बोरकर, गोविंदराव, सुनीताबाई, बापू सारी मंडळी आत केळीच्या बागेत हरवली. भाईंचं गाणं सुरू झालं-‘केळीचे सुकले बाग, असून निगराणी...' सगळ्यांनी ताल धरला. केळीचे भरघोस घड, वाहतं पाणी, हिरवी नीरव शांतता, पलीकडे गव्हाचं कापणीला आलेलं पिवळं जर्द पीक, ज्वारीचा खोडवा, त्याला मोठ्ठाली कणसं... हजार-दोन हजार पक्षी, राघूंचा थवा हे सर्व पाहून सगळेच पळसखेड गावाचं उद्ध्वस्तपण विसरले. भाईंनी ‘पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे...' सुरू केलं. पिकांसकट पाखरांनीही ताल धरला. बोरकरांनी पायांचा ठेका धरला. पायांखाली दगड-धोंडे होते, आसपास वैराण टेकड्या होत्या, पण त्यात आता स्वर्ग उभा राहिला होता. भाई, गोविंदराव बोलत राहिले. जळगाव, औरंगाबाद, अन्वीहून आमचे शेतकरी मित्र आले होते. कमी खर्चात, कमी पाण्यात आलेल्या या सुंदर पिकांचं गणित; नफा-तोटा, शेतीसाठी लागणारे परिश्रम, नवीन तंत्रज्ञान, नवी वाणं यासंबंधी कुमार अन्वीकर व मी सांगितलं. भाईंनी, गोविंदरावांनी अनेक प्रश्न विचारले व माहिती घेतली. भाईंना खूप जिज्ञासा होती; सगळं समजून घ्यायचं होतं. चार तास फक्त शेती व शेतीसंबंधीच गप्पा सुरू होत्या. जळगावचा आमचा एक मित्र म्हणाला, “भाई, इतकं शेतीचं तुम्ही कशासाठी चालवलंय?” त्यावर ते म्हणाले, “अहो, हा कृषिसंस्कृतीचा देश आहे हे आपण विसरता. त्यातली थोडी तरी अक्कल आपण उसनी का होईना, घेतली पाहिजे. शिवाय, बापू कांचन, कवी महानोर हे आमचे खास मित्र आधी शेतकरी आहेत ते काही उगाच नाही.”

अशाच गप्पांमध्ये रात्रीचे नऊ वाजले. ती माघ पौर्णिमा होती. भाई म्हणाले, “आता घरी नाही जायचं. इथल्या मोसंबीतल्या बागेत, तिथल्या झोपडीत आपण थोडा वेळ गप्पा मारू. माझ्या डोळ्यांसमोरून ती सोन्यासारखी फळांनी लगडलेली, बहरलेली बाग जात नाही. कवीइतकाच तिनेही मला लळा लावला आहे.”

औरंगाबाद, जळगावहून आलेले आमचे मित्र परत गेले. बागेत भाई, सुनीताबाई, गोविंदराव, बापू, बोरकर, त्यांची मुलगी वज्रप, डॉ. राम आपटे, रामराव, भय्या, दादा नेवे आणि आम्ही पाच-सात घरातले- एवढी मंडळी होती. रात्रीचा शांत परिसर. सहा एकरांची मोसंबीची बाग. पौर्णिमेचं स्वच्छ चांदणं. भाईंना ना. घ. देशपांड्यांच्या ‘शीळ'मधल्या ‘नदीकिनारी'ची आठवण आली. त्यांनी त्यांच्या खास पद्धतीने ती कविता म्हणायला सुरुवात केली. ते मध्येच अडले तेव्हा सुनीताबाईंनी पुढील ओळी सांगितल्या. नंतर मी. असं सगळ्यांनी मिळून त्या कवितेचं समूहगान करून टाकलं.

लगेच भाईंना लोवलेकरांची कविता आठवली-

चोरल काढ...पाऊल वाट
हळूहळू जाईल श्यामाराणी
घाटावर आणाया पाणी
हरळी दाट
मऊ सपाट
पुन्हा अभिरुचीतली,
रेखीव अंगलटीवर साडी
स्वच्छंदी
खडी शुभ्र पांढरी
कृष्ण किनारी मोर
पारधिणीची फंद फितुरी
विलोल नयनी भोर
डोंगर कठड्यांमधून जाते
तरणीताठी पोर.

डॉ. आपटे व मी गमतीने सुनीताबाईंना म्हणालो, “बघा, भाई कुठे निघून गेले! या रानात ते फार बहकले!” त्यावर त्या म्हणाल्या, “अहो, भाईंचं ते खास बहकणंच तर माझ्या आयुष्यातली मजा आहे! भाई असा कधीतरीच छान खुलतो. आता त्याला वाटतं, त्याच्यासमोर हजार लोक आहेत.”

मग मी व सुनीताबाईंनी त्या मोसंबीच्या बागेला अनेक कवींच्या कविता ऐकवल्या. बागेतली हजारभर झाडं छान ऐकत होती, डोलत होती. बोरकरांनीही खूप कविता ऐकवल्या. मध्येच उठून ते मनसोक्त गात नाचू लागले. भाईंनी अंगावरची शाल फेकून दिली व ते त्यांना ताल देत कुर्निसात करायला उभे राहिले.

भाई खुलून गेले होते. लांबच लांब झाडांच्या रांगा पाहताना ते आणखीनच आनंदी दिसत होते. मी त्यांच्याशी बोलत होतो. बोरकर म्हणाले, “आम्हाला तरी कळू द्या... फक्त दोघांमध्येच चाललंय.” त्यावर भाई म्हणाले, “एक हजार झाडांची मोसंबीची बाग. पंधरा-पंधरा फुटांवरची चौरस झाडं. माघ पौर्णिमा. टिपूर चांदणं झाडांवरून उतरलेलं. प्रत्येक झाडाखाली झाडा-झाडांच्या सावल्या, गर्द काळपट. चार झाडांच्या मध्ये उतरलेलं चांदण्याचं झाड- प्रत्येक चौरसात. हे चांदण्याचं झाड हलताना, वाऱ्याने नाचताना, तुमच्या कविता ऐकताना दिसतंय. ते खरं झाड नाहीच. त्याचं नृत्य बदलत्या कवितेवर, वाऱ्यावर वेगवेगळं आहे. जरा डोळे बारीक, किलकिले करून बघा. अख्खी एक हजार झाडं, झाडं नसलेली चांदण्याची झाडं हलताहेत, तुमच्यासोबत ताल धरताहेत. महानोर म्हणताहेत, मी लहान कवी. हे खूप सुंदर असं चित्र मला टिपताच आलं नाही कवितेत. बोरकरांना सांगा...ते कधी तरी लिहितीलही...” सगळ्यांनी तशा डोळ्यांनी चांदण्यांची बाग पाहिली. सगळेच चकित झाले, वेडे झाले. इतका सुंदर, नि:शब्द निसर्ग त्यांनी कधी बघितलाच नसावा.

शेवटी सगळ्यांनी मिळून ‘सरीवर सरी' गायलं आणि मग जड पावलांनी सगळी मैफल तिथून उठली. फर्दापूरच्या अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये सर्वांची रात्रीची सोय केलेली होती. तिथे आणखी पन्नास-साठ मित्रमंडळी वाट पाहत होती. रेस्ट हाऊसच्या सुंदर देखण्या परिसरात परत एकदा मैफल सुरू झाली तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते.

सकाळी सुनीताबाई व मी लवकर उठलो. रेस्ट हाऊससमोर झाडं होती. आम्ही दोघं तिथे गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने भाई विष्णुदासनाम्याचा अभंग गुणगुणत आले. समोर डोंगर, झाडी होती; दूरवर अजिंठा लेणी दिसत होती. भाई आणि सुनीताबाई खूप प्रसन्नपणाने सगळ्या परिसराकडे पाहत होते. मी म्हटलं, “भाई, आज आपण सोयगावला जाऊ या. तालुक्याचं गाव आहे. दहा हजार वस्तीचं. रात्री तिथले प्राध्यापक, विद्यार्थी आले होते. तिथे आम्ही नव्याने कॉलेज सुरू केलं आहे. तिथे भेट देऊ.” त्यावर भाई गडबडीने म्हणाले, “कवी, आम्ही जंगलात, रानात फिरू. कॉलेज, तिथे माझा परिचय, ते भाषण, इत्यादी अजिबात नको.” सुनीताबाईंनीही पक्का विरोध दर्शवला.

त्यावर मी त्यांना सोयगावची आणखी माहिती दिली- “भाई, सोयगाव हे तीन हजार लोकवस्तीचं खेडं होतं त्याआधीपासून त्या गावात नाट्यवेडे रसिक, कलावंत होते. मुंबई-पुण्याप्रमाणे इथल्या रंगभूमीवर साठ-सत्तर वर्षं ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, सामाजिक आणि विशेषत: संगीत नाटकं चालली. गावातल्या ‘श्रीराम नाटक मंडळा'ची स्थापना १९०५ सालातली आहे. गावाने स्वत:चं प्रचंड मोठं नाट्यगृह बांधून काढलं. लोटू भाऊ पाटील नावाच्या रसिक माणसाने, कलावंताने नाटकांसाठी लागणारे पडदे-पेटी-तबला, इतर आवश्यक गोष्टी स्वत: विकत घेतल्या. त्याच नाट्यगृहात जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार यांचं लग्न लागलं. तिथल्या रंगमंचावर नटवर्य नानासाहेब फाटक, भालचंद्र पेंढारकर, मा. भार्गवराम, मा. दामले, मा.दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव अग्रवाल, दामूअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, दाजी भाटवडेकर, रघुनाथराव शितूत, बाळ कोल्हटकर, राम जोशी, जयराम शिलेदार, विमलबाई कर्नाटकी, किशोरी पाठक, शांताबाई फाटक, शंकरराव जोशी, प्रकाश घांग्रेकर, नटवर्य नानासाहेब चाफेकर, चंद्रकांत गोखले, रा. वि. राणे अशा बऱ्याच दिग्गजांनी हजेरी लावली, नाटकं सादर केली. काही जुन्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार लोटू भाऊ पाटील यांनी या आघाडीच्या नाट्यकर्मींबरोबर भूमिका केल्या होत्या.”

हे समजल्यावर मात्र भाईंना उत्सुकता वाटली. त्यांनी आणखीही काही माहिती विचारली. आणि मग त्यांनी आणि सुनीताबाईंनी आपला विचार बदलून सोयगावला येण्याचं नक्की केलं.

मी सोयगावला एक दिवस आधीच भाई आणि सुनीताबाई येणार असल्याचं कळवलेलं होतं. त्यांच्या स्वागतासाठी निदान एक हार, फोटोग्राफर तरी तयार ठेवा अशी कॉलेजला विनंती केली होती. पण आम्ही तिथे पोचलो तर तशी काहीही तयारी तिथे दिसली नाही. कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं. तो परिसर शिक्षणापासून खूप लांब होता. तीन-चार वर्षांपासून प्राचार्य आणि त्यांचे सहकारी कॉलेजसाठी विद्यार्थी जमवण्याचा आटापिटा करत होते. गावागावांतून ज्वारी, बाजरी, मीठ, मिरची, पैसा जमा करून, खेड्यांतल्या मुलांच्या जेवणाची सोय करायची आणि मग त्यांना कॉलेजच्या वर्गांत बसवायचं, असे त्यांचे प्रयत्न चालू होते. अशा परिस्थितीत कुणी साहित्यिक गावात आला तरी त्यांची सरबराई करणं त्यांच्या आवाक्यातलं नव्हतं. आणखी पाच-एक वर्षं तरी ही परिस्थिती अशीच राहणार, अशीही खंत त्या प्राचार्यांनी बोलून दाखवली.

औरंगाबादहून आमच्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव काळे आले होते. भाईंच्या स्वागताची काहीही तयारी नसल्याचं पाहून ते भयंकर संतापले आणि म्हणाले, “लाख रुपये देऊनही न येणारा लाखमोलाचा माणूस आपल्या गावात भेट द्यायला आलाय हे कळत कसं नाही?” मात्र कॉलेजकडे त्याचं उत्तर नव्हतं. बाबुरावांनीच धावपळ करून, जवळच्या शेंदुर्णी गावात जाऊन हार वगैरे आणले. त्यांचा रागरंग पाहून मी भाईंना व इतरांना नाट्यगृहाकडे घेऊन गेलो. तिथे त्या काळातले रंगभूमीचे पडदे, इतर साहित्य, वाद्यसंगीतासाठीचा सगळा साज, त्या काळातल्या नाटकांच्या जाहिराती, तिकीट सगळं पाहुण्यांना दाखवलं. जुन्या काही लोकांनी थोडी माहिती दिली. नाट्यगृह पाहून भाई थक्क झाले आणि म्हणाले, “हे नाट्यगृह अतिशय देखणं आहे. पक्कं बांधलेलं. इतकं सुंदर नाट्यगृह मी खेड्यात कुठेही पाहिलेलं नाही. फक्त मुंबई-पुण्यात. ग्रीक रंगमंचासारखं आहे हे. त्याची बांधणी, गॅलरी इत्यादी सगळं काही छानच आहे.” त्या नाट्यगृहाच्या रंगमंचावर ते खूप वेळ नुसते उभे राहिले. सगळ्या नाट्यकृतींचा, कलावंतांचा झंकार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ते भलतेच प्रसन्न, खुषीत आलेले दिसले. कमलाकर सोनटक्के, नारायणराव काळे, सोपानमामा बोर्डे, विष्णू काळे, नाईक गुरुजी, आणखी नवे-जुने बरेच लोक जमले होते. भाई बोलत होते, सगळे ऐकत होते. भाईंनी नंतर त्यांच्या नाट्यपरंपरांच्या कथा-कहाण्या ऐकवल्या. आम्ही सगळे ऐकत राहिलो. एवढा मोठा कलावंत त्या नाट्यगृहाला, रंगमंचाला हात लावून नमस्कार करता झाला, तेव्हा सगळेच पाहत राहिले. सोयगावची नाट्यपरंपरा भाईंच्या भेटीने, बोलण्याने पुण्यवंत झाली.

भाईंच्या स्वागताचा छोटासा का होईना कार्यक्रम करण्याची सर्वांचीच इच्छा होती. मग गावातल्या शाळेच्या प्रांगणात खुर्च्या मांडल्या गेल्या. बाबुराव काळे, भाई, बोरकर त्या खुर्च्यांवर बसले. मी महत्प्रयासाने सुनीताबाईंनाही व्यासपीठावर आणून बसवलं. (त्या व्यासपीठावर येणं टाळायच्या.) समोर तरुण प्राध्यापकवर्ग, गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनी, गावातले थोडेफार लोक बसलेले होते. उपलब्ध असलेला एकमेव हार मी बाईंना घातला. दोन शाली आणलेल्या होत्या, त्या बोरकर व भाईंना दिल्या.

बाबुरावांनी गावातल्या कॉलेजची गोष्ट मोकळेपणाने सांगितली. मग भाई बोलायला उठले. आम्ही केलेलं तुटकंफुटकं स्वागत विसरून ते खूप वेळ मनसोक्त आणि दिलखुलासपणे बोलत राहिले. “माझ्या व सुनीताच्या रजिस्टर म्हणवल्या जाणाऱ्या विवाहाच्या वेळी हारसुद्धा नव्हता, इतकं ते आमच्या पद्धतीने झालं. आज एका फुलांच्या हाराने कवीने आम्हाला बांधलं. फार तर लग्न लावलं म्हणा! केवळ आमच्या कवीमुळेच आम्ही हे ऐकून घेतलं, स्वीकारलं. हे नाट्यतीर्थ, याच्या भेटीने मी पावन झालो. इथल्या मोठ्या ऐतिहासिक घटनांचे तुम्ही धनी आहात हे तुम्ही विसरू नका. नाट्यपरंपरेच्या इतिहासात हे का म्हणून येत नाही? आमच्या मुंबई-पुण्याचं सुतळीभर असलं तरी भलं मोठं होऊन येत असतं. रसिकहो, शरीराला स्नान घालतं ते पाणी व मनाला स्नान घालतं ते तीर्थ. मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, बाबा आमटे अशी माझी तीर्थक्षेत्रं आहेत. आज मी ज्या बाबा आमटे यांच्या तीर्थक्षेत्रावरून आलो त्यांच्या मुक्तांगणातलं थोडं सांगतो... (मुक्तांगण म्हणजे भाईंनी आर्थिक मदत दिली त्यातून सुरू केलेले विविध प्रकल्प आहेत.). ही खेडी, इथली माणसं, दु:ख-दारिद्य्र मला ओरबाडून टाकतं. हे गुणी विद्यार्थी, प्राध्यापक कसं काय काम करतात मला कळत नाही. या खऱ्याखुऱ्या आडवळणांच्या गावी काम करणाऱ्यांसंबंधी मला दाटून येतं. इथे महाराष्ट्राची नाट्यपरंपरा वाढली, संपन्न झाली, इतका रसिकवर्ग खेडोपाडी होता, आहे. इथे जी नाटकं आणि कलावंत आले ते ऐकून मलाही आश्चर्य वाटलं. मला हे माहीत कसं नव्हतं?”

भाई जगभरच्या प्रश्नांवरही खूप बोलले. कविवर्य बोरकरांनी दोन-तीन कविता वाचल्या. निघताना सुनीताबाईंनी सगळ्या प्राध्यापकांची, विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली. जर्जर अवस्थेतलं होस्टेल, तिथलं जेवण पाहिलं. मग त्यांनी एक चेक लिहून माझ्या हाती दिला आणि म्हणाल्या, “या होस्टेलच्या गरीब विद्यार्थ्यांना भाईंकडून खाऊसाठी थोडंफार दिलं आहे. नाही म्हणू नका.”

कोणतीही सोय नसलेलं ते शाळेचं प्रांगण, परिस्थितीशी झगडणारं कॉलेज, गावाचं नाट्यवेड सांभाळणारं नाट्यगृह, सर्वच भाईंच्या उपस्थितीने सुंदर होऊन गेल्याचं त्यादिवशी सोयगावने पाहिलं.


(समकालीन प्रकाशनाच्या 'पु. ल. आणि मी' या पुस्तकातून साभार.)

हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक : https://amzn.to/3tv6kEl
समकालीन प्रकाशनाचं हे आणि इतर कोणतंही पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 9922433606

Thursday, August 21, 2025

ध्वनीकर्णिका आणि सौजन्य

काही का असेना, लोकांच्यात सौजन्य हवे असे आमचेही मत आहे. मात्र दिल्लीच्या ध्वनिकर्णिकांना हवाई सुंदऱ्या सौजन्य शिकवणार आहेत हे ऐकून मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांनी पब्लिकला भरतनाट्यम शिकवायची तयारी दाखवली आहे असे ऐकतो, ते खरे आहे का?

हवाई सुंदरींनी ध्वनीकर्णिकांना (telephone operators) सौजन्य शिकवायला काही हरकत नाही. सौजन्य ही दुसऱ्यांनाच शिकवायची गोष्ट आहे. एकदा बसच्या सौजन्य सप्ताहात कंडक्टरने चढाऊ उतारुंना "भेंचूत, जरा जेंटलमन सारखं वागा. थोडा सौजन्यपणा दाखवलात तर काय मराल" अशा लाडिक शब्दात सौजन्य शिकवल्याचे मला स्मरते.

ह्या हवाई सुंदरींनी ध्वनीकर्णिकांना सौजन्य शिकवल्यावर त्यांचा आणि आम्हा इष्ट क्रमांक इच्छुकांचा सुखसंवाद किती गोड होईल. आम्ही 1-9-9 फिरवला आहे. पलीकडून एका ध्वनीकर्णिकेचा आवाज येतो आहे. "नमस्ते, आम्ही दिल्ली दूरध्वनी केंद्रावरून बोलत आहोत. मी आपली काय सेवा करू शकते?" हे ऐकून आपल्याला कुठला नंबर हवा आहे हे आपण विसरून जातो आहो. काही क्षण स्तब्धतेत गेल्यावर तीच तिकडून "अय्या, तुम्ही भारीच विसरभोळे दिसताय. तर मग नंबर आठवेपर्यंत थोडा वेळ ऐका वाद्यसंगीत." असे म्हणुन आपल्याला रविशंकरची किर्वाणी ऐकवत आहे.असो. पुढील कल्पना करायला घराघरांचे श्री समर्थ आहेत. आम्ही केवळ सौजन्यभयास्तव आमच्या कल्पनांना लगाम घालतो.

पु. ल. देशपांडे
पुस्तक - खिल्ली

Tuesday, June 24, 2025

कालोचित पुलं ! (अक्षय वाटवे)

पु. ल. देशपांडे यांचा १ २  जून हा स्मृतिदिन. त्यांना आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे उलटली आहेत, असे आजही वाटत नाही. त्यांचे साहित्य आजही कालोचित का वाटते, त्यांचे कथाकथन आजही 'व्ह्यूज' का मिळवते, याची ही कारणमीमांसा...

मराठी माणसाला दिलखुलास हसायला शिकवणारे, काळजाचा ठाव घेणाऱ्या संगीताच्या तालावर डोलायला लावणारे, दानाचे महत्त्व कृतीतून पटवून देणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. ‘कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचे हे सांगून जाईल,’ एवढ्या सोप्या भाषेत त्यांनी जगण्याचे मर्म उलगडून सांगितले.

असे बहुआयामी बहुरूपी पुलं देहरूपाने आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे लोटली. या एवढ्या काळात त्यांचे ना नवे लेखन प्रकाशित झाले; ना त्यांनी नवीन गाणे संगीतबद्ध केले; ना नाटक किंवा इतर काही. असे असले, तरी आजही सोशल मीडियावर सर्वत्र त्यांचा मुक्त संचार आहे. तरुण मंडळी त्यांची अवतरणे टी-शर्टवर मिरवत आहेत. त्यांचे चाहते ‘पु. ल. प्रेम’ नावाचा ब्लॉग चालवतात आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळतात. त्यांच्या नावाने महोत्सव साजरे होतात. त्यांच्या विनोदला वंदन करून, मराठी स्टँडअप सादर केला जातो आहे. हे सगळे पुलंच्या पश्चात गेली पंचवीस वर्षे आव्यहत सुरू आहे. का? निव्वळ लोकप्रियता? नाही. निर्विष विनोदातून, मराठी माणसाच्या आयुष्यावर त्यांनी केलेल्या साखर पेरणीमुळे, सुरेल संगीतातून रोजच्या जगण्यावर त्यांनी घातलेल्या हलक्या फुंकरीमुळे (पाऊस सुरू झाल्यावर ‘नाच रे मोरा’ आठवतेच) आणि आपल्या जवळचे कोणी आपल्याशी खासगीत ऐसपैस गप्पा मारत आहे, अशा थाटात रसिकांवर प्रेम करून, त्याला सतत आनंदी राहण्याचा कानमंत्र दिल्यामुळे पुलंना ही अपार लोकप्रियता लाभली असावी. दिवसागाणिक ती वाढते आहे. हा आनंदाचा ठेवा मराठी माणसाच्या पुढच्या पिढीने खुशीने लुटावा, यासाठी अनेक मंडळी स्वयंप्रेरणेने उपक्रम राबवत आहेत. पुलं असताना आणि आज त्यांच्या मागेही त्यांच्या साहित्यावर टीका झाली नाही, असे नाही. दर काही वर्षांनी पु. ल. देशपांडे यांचे साहित्य कालबाह्य झाले, म्हणजे आधुनिक मराठीत सांगायचे तर ‘आउट डेटेड’ झाले अशी आवई उठते. त्यांनी अमुक का केले नाही किंवा तमुकच का केले, असे प्रश्न विचारण्याचा मोहही अनेकांना आवरत नाही. या सगळ्यांतून नक्की काय साध्य होते? पु. ल. देशपांडे यांचे लेखन हे ‘साहित्य’ या एवढ्या चौकटीत मर्यादित राहिलेले नाही, तर तो आता अभिजात मराठीचा एक अविभाज्य संस्कार बनला आहे.

हा कालबाह्यतेचा मुद्दा अधूनमधून वर येतो, त्याचा प्रमुख आधार म्हणजे पुलंच्या लेखनात येणारी चाळीची, गावाची वर्णने, किंवा तात्कालीन संदर्भ. त्यांच्या पात्रांची वेशभूषा, त्यांची जीवनपद्धती वगैरे घटक आज शिल्लक उरलेले नाहीत. केरसुणी, घडवंची, लुगडी, स्टोव्ह वगैरे शब्दप्रयोग आज वापरात नाहीत; कारण या वस्तूच आपल्या दैनंदिन जीवनातून नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे हे संदर्भ आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या गमतीजमतींची आजच्या पिढीला कदाचित सांगड घालता येणार नाही. हे मान्य केले, तरी त्या व्यक्तीचित्रणातील व्यक्तीरेखा, त्यांच्या स्वभावाचे कंगोरे, त्याला असलेली भावनिक किनार, त्यातला रसरशीत ताजेपणा हे सारे ठळकपणे समोर येतेच.

मराठी भाषेचा वापर व्यवहारापुरता आणि जेमतेम करणाऱ्यांना पुलंच काय, एकंदरीत मराठी भाषाही आउट डेटेड वाटू शकते. मात्र, प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृती दीपस्तंभाप्रमाणे किंवा नभांगणातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ दिशादर्शक आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पुलं सर्वार्थाने ‘परफॉर्मर’ असल्यामुळे त्यांनी तत्कालीन बहुसंख्य मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनात हक्काचे स्थान पटकावले होते. सुशिक्षित, मध्यमवर्गीय आणि अधिकतर शहरी मराठी माणसाचे जगणे पुलंनी आपल्या लेखनातून, नाटकातून, कथाकथनातून, एकपात्री प्रयोगांतून, चित्रपटांतून, दूरदर्शनवर सादर केलेल्या कार्यक्रमांमधून मांडले. त्यांनी निव्वळ हसवले नाही, तर या वाचक-प्रेक्षकाच्या अत्यंत समीप वर्तुळातील जिव्हाळ्याचे स्थान त्यांना मिळाले, म्हणून तर त्यांच्या निधनानंतर आपला माणूस गेल्याची भावना अनेकांच्या मनात दाटली.

त्यांच्या कथनशैलीत अभिनिवेश नव्हता, आक्रमकता नव्हती, कसलाही डांगोरा पिटलेला नव्हता. अगदी सहज; पण अत्यंत बारकाईने माणसाच्या वेषाची, स्वभावाच्या विविध पैलूंची, त्यांच्या जीवनातल्या व्यामिश्रतेची केलेली मिश्कील निरीक्षणे वाचकांना सापडली. त्या निरीक्षणातून एका आनंदयात्रीचा जीवनातली मज्जा उलगडवून दाखवणारा सोपा मार्ग सापडला. पुलंची अनेक वाक्ये आमच्या मागच्या पिढीत, आमच्या पिढीत आणि मधल्या पिढीतही रोजच्या बोलण्यात सहज येऊ लागली. बोलताबोलता टपल्या मारण्यासाठी आम्हाला नर्मविनोदाचा आदर्श पुलंनीच घालून दिला. बघण्याची दृष्टी तिरकस असेल; पण नजर बोचरी नव्हती. ज्या काळात स्टँड अप कॉमेडी नावाचा प्रकार महाराष्ट्राला माहीत नव्हता, त्या काळात पु. ल. देशपांडे या प्रकारातले ‘ग्रेट एंटरटेनर’ होते. ते कालातील असण्यासाठी ही एवढीच करणे नाहीत, तर त्यांचे विविध मार्गांनी मराठी साहित्य आणि समाजाच्या जडणघडणीमधे सहभागी असणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते.

सामाजिक कार्यात, विविध साहित्य विषयक उपक्रमांत, रंगमंचावर, दूरदर्शनवर सर्व ठिकाणी अत्यंत जिव्हाळ्याने आणि आपुलकीने सहभागी व्हायचे. हे सर्व निगुतीने निभावताना आलेल्या प्रत्येक पत्राला जातीने उत्तर देणे, चाहत्यांशी, वाचकांशी अत्यंत सहृदयतेने संवाद साधणे अशा स्वभावविशेषामुळेही त्यांना रसिक वाचकांचे हृदय सिंहासन सहज प्राप्त झाले. हे करतानाच त्यांनी स्वतःतला चोखंदळ रसिक वाचक लोप पावू दिला नाही. अनेक लेखक, कलावंतांची त्यांनी पाठराखण केली. प्रोत्साहन दिले. त्यांच्याविषयी लेखन केले. हे सारे करताना त्यांनी कोणताही बडेजाव केला नाही. एका हाताने केलेले कार्य दुसऱ्या हाताला कळणार नाही, याची खबरदारी घेतलेली असायची. त्यामुळे त्यांचे साहित्य आणि त्यांचा सामाजिक जीवनातील वावर वेगळा काढता येणार नाही, असेही वाटते. त्यांचे संवेदनशील कलाकार असणे आणि सजग माणूसपणदेखील वेगळे काढता येत नाही.

एखाद्या लेखक कलावंताविषयी अशी संपूर्ण आश्वासकता वाटावी, असे दुसरे उदाहरण सापडणे दुर्मीळ आहे. पुलंवरच्या अफाट प्रेमातूनच मराठी माणूस त्यांच्या साहित्याच्या पालखीचा भोई झाला. ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’, ‘हसवणूक’, ‘गणगोत’ अशी सर्व प्रकाशित पुस्तके; शिवाय त्यांच्या भाषणांचा संग्रह, अनुवादित साहित्य, ध्वनीचित्रफिती वगैरे असा सगळा माणिकमोत्यांहून मूल्यवान ऐवज या प्रेमाच्या पालखीत मराठी रसिक वाचकाने सजवला. अभिजात मराठी भाषेच्या साहित्य-संस्कृती दिंडीत ही पालखी आजतागायत तो दिमाखात मिरवतो आहे; मिरवत राहील...

असा अंतर्बाह्य कला, साहित्य, संस्कृतीशी समर्पित असलेला आणि समाजाविषयी सदोदित जागरूक असणारा बहुरूपी बहुआयामी लेखक सहजासहजी विस्मरणात जाणे शक्य नाही. तसे झाल्यास तो मराठी भाषकांचा करंटेपणा किंवा दुर्दैव म्हणावे लागेल.

-अक्षय वाटवे
https://www.instagram.com/akshay_watve/
१ २ जून २ ० २ ५
महाराष्ट्र टाईम्स